अ‍ॅपशहर

​ बोगस शाळांचा बाजार!

अनधिकृत शाळांकडे सरकारी यंत्रणांनी केलेल्या दुर्लक्षाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून ठाणे महापालिका हद्दीतील तब्बल १२ हजारांहून अधिक विद्यार्थी व ४८६ शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या हद्दीतील ६० बेकायदा शाळांची यादी जाहीर झाली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करून पालिकेने हात झटकले असले तरी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना आता इतर शाळांमध्ये प्रवेश तरी कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 4:00 am
६० शाळांतील १२ हजार विद्यार्थी आ​णि ४८६ शिक्षकांचे भवितव्य पणाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal school in thane
​ बोगस शाळांचा बाजार!


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

अनधिकृत शाळांकडे सरकारी यंत्रणांनी केलेल्या दुर्लक्षाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून ठाणे महापालिका हद्दीतील तब्बल १२ हजारांहून अधिक विद्यार्थी व ४८६ शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या हद्दीतील ६० बेकायदा शाळांची यादी जाहीर झाली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करून पालिकेने हात झटकले असले तरी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना आता इतर शाळांमध्ये प्रवेश तरी कसा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेच्या हद्दीत सगळीकडेच या अनधिकृत शाळांचे पेव फुटले असताना सर्वात जास्त बेकायदा शाळा दिवा विभागात आहेत. येथील बेकायदा शाळांची संख्या जवळपास निम्मी म्हणजे २८ इतकी आहे. त्यानंतर लगतच्या मुंब्रा येथे १८ आणि कळव्यात ६ अनधिकृत शाळा आहेत. ठाण्यासारख्या शहरातही ७ अनधिकृत शाळा उभ्या राहीपर्यंत सरकारी यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नव्हता. त्यातील एक शाळा डोंबिवली रोड परिसरात आहे.

मराठी शाळांना मागणी कमीच

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ६० प्राथमिक अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व शाळांना राज्य सरकार किंवा ठाणे पालिकेची मान्यता घेण्यात आलेली नाही. या शाळांमध्ये सर्वाधिक ४९ शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल हिंदी माध्यमाच्या ६ आणि ४ मराठी शाळांचा या यादीत समावेश आहे. तर उर्वरित १ शाळा उर्दू माध्यमाची आहे. त्यामुळे पालकांची पसंती इंग्रजी माध्यमालाच असून मराठी शाळांची मागणी कमी होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

पालिकेच्या कारवाईकडे लक्ष

या सर्व शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करून पालिका सध्या मोकळी झाली आहे. त्यानंतरही व्यवस्थापनाने शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला तर पालिकेचा शिक्षण विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळा बंद करण्यासह त्यांना जबर दंड ठोठावण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. दर दिवसाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड पालिका करू शकते. कोणत्याही स्वरूपाची कारवाई झाली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान अटळ आहे.

संख्या उघड झाली, हे महत्त्वाचे!

केवळ ठाणे पालिकेच्या हद्दीत बेकायदा शाळा आहेत, असे नाही. परंतु, लगतच्या कल्याण डोंबिवलीत ६ तर भिवंडीत ५ बेकायदा शाळा असताना ठाण्यात मात्र त्यांची संख्या इतकी जास्त कशी, अशी विचारणा केली असता किमान या शाळा बेकायदा असल्याचे उघड झाले हेदेखील कमी नाही, अशी भूमिका या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर घेतली. काहीवेळा पालक केवळ घराजवळ शाळा असावी, याचा विचार करून आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये प्रवेश देतात, पण ती किमान अधिकृत आहे की नाही, याची खातरजमा त्यांनी करून घ्यावी, अशी अपेक्षा या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज