म. टा. वृत्तसेवा, पालघर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेस आज ६२ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जव्हार शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन नवयानी बौद्धांच्या उपस्थितीत जव्हार तालुक्यातील उत्साहात साजरा करण्यात आला.
धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा भारतीय बौद्धांचा, विशेषतः नवयानी बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 'अशोका विजयी दशमी' (दसरा) व १४ ऑक्टोबर रोजी देशभरासह जगभरातून लक्षावधी बौद्ध अनुयायी एकत्र हा सण साजरा करतात.
६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन 'अशोका विजयादशमी' म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जव्हार येथे साजरा करण्यात आला. यावेळी जयेश लोखंडे यांनी सूत्रसंचालनासह बौद्ध बांधवाना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक नगरसेविका विशाखा अहिरे यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी गोविंद बल्लाळ, रमेश केदार, सर्वेशकुमार साळवे, मुरलीधर शेवाळे, नितीन बल्लाळ, गुंडू भाई बल्लाळ, चंचल केदार आणि इतर बौद्ध बांधव उपस्थित होते.