म. टा. वृत्तसेवा, ठाणे
विविध प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी 'न्यायनिर्णय जिल्ह्याच्या दारी' हा पुण्यात राबविलेला अभिनव उपक्रम यशस्वी झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी कोकण विभागात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात ठराविक दिवशी विशेष कॅम्प आयोजित करून न्यायनिर्णय करण्यात येणार आहे. यामुळे प्रतिवादींचा वेळ, पैसा अशी सर्वांचीच बचत होईल, असे देसाई यांनी सांगितले.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळखोरांवर कारवाई केली जाते. कारवाईत लेबल दोषही आढळून येतात. कारवाईनंतर प्रकरणांची सुनावणी सहआयुक्तांच्या दालनात होते. यावेळी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार सहआयुक्तांना आहे. तसेच, सुनावणीच्या वेळी प्रतिवादींचे वकील उपस्थित असतात. प्रतिवादींनाही त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळते. अशाप्रकारे विविध प्रकरणांचा निपटारा केला जातो. मात्र ही प्रकरणे निकाली काढण्याच्या कामांसह अधिकाऱ्यांना अन्य कामेही असतात. अशावेळी प्रकरणे प्रलंबित राहतात. एफडीएच्या कोकण विभागात ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आदी पाच जिल्हे असून सद्यस्थितीत पाचशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. रायगड, सिंधुदुर्गमधून सुनावणीसाठी ठाण्यात येण्यास वेळ जातो. त्यात सुनावणी न झाल्यास दिवस तसेच पैसेही वाया जातात. त्यामुळे एफडीएचे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी देसाई यांनी पुण्यात राबविलेली 'न्यायनिर्णय जिल्ह्याच्या दारी' ही संकल्पना ठाण्यातही राबविली जाणार आहे. त्या-त्या जिल्ह्यात प्रकरणांची सुनावणी घेऊन प्रकरणांचा अधिक जलदगतीने निपटारा होईल आणि नागरिकांचीही पायपीट थांबेल, हा यामागचा उद्देश असल्याचे देसाई यांनी सांगितले.
या संकल्पनेनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत प्रकरणांचा निपटारा केला जाणार असून महिन्यातून एकदा विशेष कॅम्पही आयोजित केला जाईल. प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होणार नाही, तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहील, असेही देसाई म्हणाले. पुण्यात राबविलेल्या उपक्रमातून दीड कोटींचा दंड वसूल करण्यास एफडीएला यश आले होते.
एका महिन्यात दोन जिल्ह्यांचा आढावा
अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी महिन्यातून दोन जिल्ह्यांतील कामकाजाचा आढावा घेण्याबाबत सहआयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे 'न्यायनिर्णय जिल्ह्याच्या दारी' उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याचा आढावाही घेतला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.