ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ही शहरे खाडीकिनारी वसलेली आहेत. समुद्रसपाटीला जवळ असलेल्या या शहरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. पाऊस जास्त झाला आणि खाडीला भरती असली तर रस्ते जलमय होतात हा नेहमीचा अनुभव आहे. पाणी आणि डांबर हे एकमेकांचे शत्रू समजले जातात. त्याचमुळे या भागातील डांबरी रस्ते हे चांगल्या प्रतीचे असणे अभिप्रेत आहे. अशा ठिकाणी रस्ते उभारण्यासाठी विशिष्ट पद्धती अवलंबायची असते. रस्त्यांवर पाणी थांबणार नाही अशा पद्धतीने त्यांचा उंच-सखलपणा राखायचा असतो. रस्त्यांवरील पाण्याच्या निचरा तातडीने होईल, याचीही काळजी घ्यायची असते. मात्र, या सर्वच आघाड्यांवर सध्या आनंदीआनंद आहे. या सर्व महापालिकांमध्ये सर्वाधिक खर्च हा रस्ते उभारणीवर होतो. त्यानंतरही दर पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जातात. पालिका, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी कोणतेही सरकारी प्राधिकरण त्याला अपवाद नाही. रस्त्यांची ही दैना होण्यामागे अधिकारी, राजकारणी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट साखळी कारणीभूत असते. दर पावसाळ्यात या भ्रष्टाचाराबाबतची केवळ चर्चाच होते. तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. पारदर्शी कारभाराचे दाखले देणाऱ्या सरकारने तरी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
पारदर्शकता खड्ड्यात
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ही शहरे खाडीकिनारी वसलेली आहेत समुद्रसपाटीला जवळ असलेल्या या शहरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते...
Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am