म. टा. वृत्तसेवा, पालघर
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने डहाणू तालुक्यातील घोलवडनजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते पार पडले. पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण ना. दवणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी ग्रंथतुलेतून उपस्थितांनी वाचनालयाला सढळ हस्ते मदत केली. त्यानंतर निवडक कवींनी काव्यवाचन केले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खेडोपाड्यांत वाचन संस्कृती रुळावी, या उद्देशाने हे वाचनालय उघडण्यात आले. त्याला अनेक दात्यांनी पुस्तकरूपी भेट दिली. त्यांचे आभार या वाचनालयाच्या संचालिका कवियत्री वीणा अजित माच्छी यांनी मानले. तर, या वाचनालयाची निर्मिती, संकल्पना व स्थापनेपर्यंतचा प्रवास अजित माच्छी यांनी उलगडला. शिवाय. ग्रामीण भागात नवकवींना प्रोत्साहन देण्यासाठी पद्मश्री मधू मंगेश कवीकट्ट्याची स्थापना करण्यात आली. यावेळी साहित्यलेखनाला प्रारंभ करण्याचा वसा उपस्थितांपैकी अनेकांनी घेतला.
पुस्तके भविष्य घडवित असल्याचे मार्गदर्शन कोमसाप केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर यांनी केले. घरात सार्वजनिक वाचनालयाला जागा उपलब्ध करून चिकूच्या गावी, पुस्तकांची बाग फुलविण्याचा माच्छी दाम्पत्यांचा निर्णय परिवर्तन घडविणारा असून हे भविष्यातील ऊर्जाकेंद्र होईल, असा विश्वास डॉ. महेश केळुसकर यांनी व्यक्त केला.
या साहित्याच्या बँकेत पुस्तकांची केलेली गुंतवणूक पुढील पिढीच्या नवोदित साहित्यिकांना मोठे भांडवल असणार असल्याचे सांगून त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव प्रवीण ना. दवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केला. प्रा. डॉ. अंजली मस्कराहन्स यांच्या 'आदिवासी लोककथा मीमांसा' या पुस्तकांचे विमोचन पार पडले.
पुणे येथील न्यायिक लढ्याचे संपादक विकास राऊत यांनी वीणा माच्छी यांची ग्रंथतुला करून वाचनालयाला आध्यात्मिक पुस्तके भेट दिली. त्यानंतर पालघर, ठाणे, कोकण, पुणे, औरंगाबाद तसेच उर्वरित महाराष्ट्रातून आलेल्या निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अनुपमा उजगरे, उद्योजक रौनक शहा, कोमसाप डहाणू शाखा अध्यक्ष सदानंद संखे, कार्यवाह प्रेमनाथ राऊत, संपादक रामदास वाघमारे, घोलवड सरपंच राजश्री कौल, धीरज बारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तरे यांनी केले.