म. टा. वृत्तसेवा, कल्याण
अनाथ मुलांच्या संगोपनासाठी डोंबिवलीत गेल्या २५ वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या जननी आशिष अनाथालयाच्या समुपदेशक जयश्री देशपांडे यांचे रविवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने अनाथालयच पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
मास्टर ऑफ सोशल वर्कर क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या देशपांडे यांनी स्वत:ला अनाथ आणि उपेक्षित आदिवासी समाजातील मुलांच्या संगोपनासाठी वाहून घेतले होते. डोंबिवलीतील आपल्या इतर सहकारी मैत्रिणींच्या मदतीने २५ वर्षांपूर्वी त्यांनी जननी आशिष या अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेची उभारणी केली. संस्थेच्या अध्यक्षपदाची आस न बाळगता देशपांडे यांनी या संस्थेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. आजवर ४७० अनाथ मुलांना हक्काचे पालक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या मुलांना केवळ दत्तक देऊन न थांबता त्या मुलांचे व्यवस्थित संगोपन होत आहे ना, याकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असे. जननी आशिषसोबतच संजीवनी ट्रस्टच्या वतीने आदिवासी मुलांच्या शाळा दत्तक घेत त्यांनी या मुलांच्या उत्कर्षासाठी प्रचंड प्रयत्न केले.
देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी न्यूमोनियाने ग्रासले होते. त्या आजारातून उठताच पुन्हा त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. मात्र त्यानंतर पुन्हा आजाराने त्यांना घेरले. आठ दिवसांच्या आजारपणानंतर त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती रमेश देशपांडे आणि मुलगा अनिरुद्ध असा परिवार आहे. दुपारी तीन वाजता डोंबिवलीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.