म. टा. प्रतिनिधी, ठाणे
येऊरमधील खदानीमधील पाण्यात गुरुवारी एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याठिकाणी संरक्षित भिंत बांधण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असूनही त्याकडे पालिका प्रशासनासह वनविभागही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहेत.
पाण्याने भरलेल्या या खदानीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशम दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील चौकशीत हा मृतदेह गोविंद तांडेल (५०) यांचा असल्याची माहिती पुढे आली. बुधवारी तांडेल घरातून २० रुपये घेऊन बाहेर पडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळून आला. वर्तकनगर पोलिस याबाबत चौकशी करत आहेत. येऊरच्या दरीत ही खदान असून महापालिका आणि वनविभाग यांच्या समन्वयाअभावी खदानीभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.