पायदान आणि प्लॅटफॉर्ममधील अंतर मोठे
अपूर्ण कामांचा प्रवाशांना फटका
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची ९०० ते ९२० मिमी इतकी वाढवून सगळे प्लॅटफॉर्म सुरक्षित झाल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला असला तरी कल्याणपलिकडच्या स्थानकांमध्ये अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा, वासिंद, आंबिवली येथील प्लॅटफॉर्म उंचीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे येथील अंतर अधिक दिसून येत आहे. तर शहाड, आंबिवली, खडवली, आटगाव, खर्डी आणि कसारा येथील उंची वाढवण्याचे काम प्रलंबित आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म पाच ते सातचे अंतरही मोठे असल्याने प्रवाशांसाठी हे प्लॅटफॉर्म अडचणीचे ठरत आहेत. तर या पोकळीमध्ये पडून प्रवाशांचे जीव गमावण्याचा धोका अधिक असल्याचा दावा रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई ते कल्याणदरम्यानच्या अनेक प्लॅटफॉर्मची उंची वाढल्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रामुख्याने अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेकडून २५९ प्लॅटफॉर्मची उंची वाढवून मध्य रेल्वेच्या सर्व प्लॅटफॉर्मचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला. परंतु कल्याणपलिकडच्या स्थानकांमध्ये अद्यापही कामे सुरू आहेत. या कामांमुळे प्रवाशांना त्रास होत असून प्लॅटफॉर्मवर चढण्यासही अडथळे येत आहे. कल्याण रेल्वे स्थानकासह पुढील प्रत्येक रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मच्या उंचीमध्ये अद्यापही त्रुटी आढळून आल्या आहेत. कल्याण-कसारा आणि कर्जत प्रवासी संघटनेकडून या भागातील शहाड, आंबिवली, खडवली, आटगाव, खर्डी आणि कसारा रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची अद्याप कमी असल्याने लोकलमध्ये चढताना प्रवाशांना त्रास होत असल्याचे मत के३ प्रवासी संघटनेचे शाम उबाळे यांनी व्यक्त केले.