अ‍ॅपशहर

समाजमंदिरात वाचनालय

देशात आदिवासींसाठी अनेक प्रकल्प सरकारकडून राबवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यातील बोटावर मोजण्याइतक्याच प्रकल्पांचा लाभ आदिवासींना मिळत असतो. बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या लव्हाळी आदिवासी पाड्यातही अशाचप्रकारे समाजमंदिर पडून होते. मात्र लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजमंदिराचे रूपांतर वाचनालयात करण्यात आले आहे.

Maharashtra Times 20 Apr 2017, 3:00 am
लव्हाळी आदिवासी पाड्यात लक्ष्य फाऊंडेशनचा उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम liabrary in samajmandir
समाजमंदिरात वाचनालय


म. टा. वृत्तसेवा, बदलापूर

देशात आदिवासींसाठी अनेक प्रकल्प सरकारकडून राबवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यातील बोटावर मोजण्याइतक्याच प्रकल्पांचा लाभ आदिवासींना मिळत असतो. बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या लव्हाळी आदिवासी पाड्यातही अशाचप्रकारे समाजमंदिर पडून होते. मात्र लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजमंदिराचे रूपांतर वाचनालयात करण्यात आले आहे. या वाचनालयाच्या सुविधेमुळे आदिवासींना विविध पुस्तकांसह, वृत्तपत्रे, नोकरी मार्गदर्शन पुस्तके वाचायला मिळणार असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

विविध योजना आणि प्रकल्प आदिवासींसाठी सरकारकडून राबवल्या जातात. मात्र सरकारच्या भोंगळ कारभार तसेच भ्रष्टाचारामुळे उभारलेल्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष होते. त्याचे योग्य नियंत्रण न केल्याने अनेक वास्तू बंद राहतात. असाच काहीसा प्रकार बदलापूरपासून काही किलोमीटरवर असलेल्या चरगाव ग्रामपंचायतीमधील लव्हाळी या आदिवासी पाड्यावर पाहायला मिळत होता. मुरबाड मार्गावर असलेल्या लव्हाळी आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजमंदिर बांधले होते. मात्र लग्नसमारंभ आणि एखाद-दोन बैठका सोडल्या, तर या समाजमंदिराचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे वर्षभर हे समाजमंदिर बंद होते. याचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी बदलापुरातील लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून येथे एकलव्य कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे.

लक्ष्य फाऊंडेशनने येथील आदिवासी विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठांसाठी विविध पुस्तके, त्यात धार्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा तसेच मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रे, मासिके, नोकरीविषयक माहिती देणारे साहित्यही येथे ठेवले आहे. त्यामुळे लव्हाळी आणि आसपासच्या पाड्यांवरील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. शहरापासून दूर असलेले अनेकजण बऱ्याचदा शिक्षणाच्या संधी आणि नोकऱ्यांच्या संधीबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना शहराच्या सर्वच घडामोडी कळाव्यात, यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची माहिती लक्ष्य फाऊंडेशनचे शिरीष पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, संस्थेच्या या उपक्रमामुळे आदिवासींनीही समाधान व्यक्त केले आहे. पैशांअभावी आणि पूर्वी उपलब्धतेअभावी धार्मिक ग्रंथ आणि वृत्तपत्रे वाचण्याची संधी कधी मिळाली नव्हती. आता या उपक्रमामुळे वाचनाची संधी मिळाली, याचा आनंद असल्याच्या प्रतिक्रिया आदिवासींनी दिल्या. नुकत्याच डोंबिवली नागरी सहकारी बॅँकेचे बदलापूरचे शाखाप्रमुख शेखर जोशी यांच्या हस्ते या एकलव्य कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज