(वि)स्मरणातले ठाणेकर
आद्य मराठी ग्रंथालयाचे संस्थापक : वि. ल. भावे
मकरंद जोशी
गोष्ट तशी अगदीच जुनी... म्हणजे नेमके सांगांयचे तर सुमारे १२८-१२९ वर्षांपूर्वीची. ठाण्यातील एका वकिलांच्या चिरंजीवांनी मॅट्रिकच्या वर्षात असताना, इतिहासाच्या पुस्तकासाठी पैसे मागितले (म्हणजे 'आणे', कारण तेव्हा पुस्तके आण्याला मिळायची) तर स्वभावाने कंजूस असलेल्या वडिलांनी ते दिले नाहीत आणि सांगितले की सध्या दुसऱ्या कोणाच्या पुस्तकावरून अभ्यास करून वेळ भागव. वर वकिली युक्तिवाद केला की 'जर पुस्तक विकत न घेता तू पास झालास तर पुस्तकासाठी खर्च करायची गरज नव्हती हे सिद्ध होइल आणि नापास झालास तर तुझ्या पास झालेल्या मित्राचे पुस्तक वापरता येईल म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पुस्तक विकत घ्यायची जरूरी नाहीच'. तो मुलगा मॅट्रिकची परीक्षा तर पास झालाच, पण वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी भारतातील पहिले मराठी पुस्तकांचे सार्वजनिक वाचनालय स्थापन करून, कोणाही गरजूला आवश्यक ते पुस्तक मिळण्याची सोय निर्माण केली. तो मुलगा म्हणजेच महाराष्ट्र सारस्वतकार 'विनायक लक्ष्मण भावे'.
ठाणे शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा कणा ठरावे, असे मराठी ग्रंथांचे संग्रहालय सुरू करणाऱ्या वि. ल. भावे यांचा जीवनप्रवास अतिशय रोचक आणि रंजक आहे. ६ नोव्हेंबर १८७१ रोजी पनवेलजवळील पळस्पे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकिली पेशाच्या निमित्ताने ठाण्याला स्थायिक झाले. त्यामुळे बालपणापासूनचा सगळा काळ त्यांनी ठाण्यात घालवला. शाळकरी वयात त्यांचे मन कधी वर्गातल्या अभ्यासात रमले नाही. कधी पारसिकच्या डोंगरावर तर कधी पोखरणीवर (आजचा पोखरणचा तलाव) भटकण्यात आणि कबुतरे उडवण्यात ते रंगून जायचे. त्यामुळे मराठी शाळेतील शिक्षण त्यांनी पूर्ण केलेच नाही. मात्र याच काळात शाळेतील शिक्षक जनार्दन बाळाजी मोडक यांच्यामुळे भावे यांचा कवितेशी परिचय झाला आणि त्यांच्यातील नादिष्ट कवितेने नादावला. मुळात त्यांना वाचनाची आवड होतीच. त्यामुळे त्या काळात ठाण्यात प्रकाशित होणारी अरुणोदय, जग समाचार, हिंदू पंच ही नियतकालिके ते आवर्जून वाचत असत. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर भावे मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत दाखल झाले. तिथे प्रा. अलेक्झांडर यांचे मार्गदर्शन लाभले आणि भावेंना वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र यात चांगलीच रुची निर्माण झाली. शाळेत असताना केलेल्या मुक्त भटकंतीला आता या विषयांमुळे दिशा मिळाली आणि त्यासाठी भावे अवघ्या ठाण्याचा परिसर पायाखाली घालू लागले. मात्र पशु-पक्षी-वनस्पती यांचे नमुने गोळा करण्याबरोबरच ते मराठी साहित्याचे नमुनेही गोळा करण्यात बुडालेले असायचे. त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्या आधीच त्यांनी प्रा. विजापूरकरांच्या निबंधमालेत 'महाराष्ट्र सारस्वत' हा १००-१२५ पानांचा निबंध लिहिला आणि मराठी साहित्याच्या संगतवार नोंदींची पायभरणी केली. १ जून १८९३ रोजी त्यांनी ठाण्यातील आपल्या समविचारी मित्रांबरोबर पहिल्या सार्वजनिक मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली, तेव्हा त्यांचे महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. १८९५मध्ये भावे बीएससी झाले. मात्र १८९८मध्ये प्लेगच्या साथीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घरचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी त्यांनी मिठाच्या व्यापारात उडी घेतली. व्यापाराचा कोणताही पूर्वानुभव नसताना भावेंनी दिवस रात्र मेहनत करून या जम बसवला आणि महाराष्ट्राबाहेर मद्रास, कोचीन येथे पेढ्या उभारल्या. मात्र व्यापारात भरभराट झाली तरी भावेंचे चित्त गुंतले होते साहित्याच्या क्षेत्रात. त्यामुळेच १९१८ साली आपला जोरात चाललेला धंदा सोडून स्वतःच्या आवडीच्या विषयांमध्ये वाहून घेतले. वि. ल. भावे यांचे नाव प्रामुख्याने महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथाशी जोडले जाते, कारण मराठी साहित्याची नोंद करण्याची सुरुवात भावे यांनी केली. सुरुवातीचा १०० पानांचा निबंध त्यांनी अधिक संशोधन करून विस्तृत केला. १९१९मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केली. १९०३ साली भावे यांनी 'महाराष्ट्र कवी' हे मासिक सुरू केले. त्याची वार्षिक वर्गणी होती १/- रुपया. या मासिकाचे त्याकाळात १५०० सभासद होते आणि ५० अंक प्रकाशित झाले. देवगिरीच्या यादवांच्या काळापासून ते पेशवाईपर्यंतच्या मराठी कवींच्या काव्यरचना आणि त्यांचा परिचय या मासिकात दिलेला असे. मराठीबरोबरच इंग्रजी साहित्याचा व्यासंग असणाऱ्या भावे यांना नेपोलियनच्या पराक्रमाने प्रभावित केले होते. त्यामुळे १९१७ साली त्यांनी 'चक्रवर्ती नेपोलियन' हे चरित्र लिहिले. याच वर्षी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमा करण्यासाठी त्यांनी 'मराठा दप्तर' या संस्थेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहायचे त्यांच्या मनात होते. त्यादृष्टीने त्यांनी कागदपत्रे जमवायला सुरुवात केली होती. 'अफजलखानाचा वध अथवा शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम' असे एक पुस्तक त्यांच्याकडून लिहून झाले. चरित्र लेखन राहून गेले. स्वभावाने निर्भिड असलेले भावे स्वतःची मते मांडताना कचरत नसत. त्यांना उत्तम विनोदबुद्धी होती. मित्रांशी गप्पा मारताना विनोदाचा वापर करून समोरच्याला गार करण्याची त्यांची सवय होती. व्यापारात संपत्ती कमावल्यामुळे अनेकजण त्यांच्याकडे मदतीसाठी जात,मात्र भावे त्यातील खऱ्या गरजूंना हेरूनच मदत करत. कर्वे यांच्या महिला विद्यापीठाला त्यांनी एका बैठकीत पन्नास हजार रुपयांचे बॉण्ड्स दिले होते. तर चिरोल खटल्याच्यावेळी लोकमान्य टिळकांना संदर्भासाठी लागणारी पुस्तके पाठवण्याबरोबरच एक लाख रुपये उसने देण्याचे कामही भावे यांनी केले होते. महाराष्ट्र सारस्वतच्या निमित्ताने महानुभाव पंथातील महंतांशी असलेल्या स्नेहसंबंधामुळे भावेंना महानुभवांचे साहित्य वाचायला मिळाले आणि मराठी भाषिकांना अज्ञात असलेले साहित्य प्रकाशात आले. मराठी साहित्य आणि ग्रंथसंग्रह या संदर्भात पायाभूत कामगिरी बजावणाऱ्या वि. ल. भावे यांचे निधन वयाच्या ५५व्या वर्षी १२ सप्टेंबर १९२६ रोजी पुणे येथे झाले. मात्र त्यांनी ठाण्यात स्थापन केलेले आद्य मराठी ग्रंथालय आजही त्यांच्या दूरदृष्टीचे स्मारक बनून वाटचाल करत आहे.
मकरंद जोशी
makarandvj@gmail.com
(संदर्भ : महाराष्ट्र सारस्वत, चौथी आवृत्ती )