म. टा. वृत्तसेवा, कल्याण
भाषाप्रभु राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे २५ मे रोजी काव्यवाचन स्पर्धा व २६ मे रोजी गडकरी व सावरकरांच्या साहित्याचा दोन दिवसांचा साहित्य जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.
२५ मे रोजी सायंकाळी काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. या सत्राचे उद्घाटन शिवसेनेचे फुलंब्री व संभाजीनगरचे संपर्कप्रमुख विजय देशमुख यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राममारुती समाधी संस्थान कल्याणचे अध्यक्ष शिरीष गडकरी, कल्याणचे शिक्षण महर्षी व प्रख्यात कवी विजय पंडित व लेखिका सोनाली दिघे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. काव्यवाचन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवी सहभागी होणार आहेत. काव्यवाचन स्पर्धेचे संयोजन प्रख्यात कवी किरण जोगळेकर करणार असून परीक्षक म्हणून अजित महाडकर व अरविंद म्हात्रे काम पाहणार आहेत.
रविवारी, २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भाषाप्रभु राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्यावर प्रख्यात कवी अरुण म्हात्रे व प्राची गडकरी कविता व व्याख्यानातून साहित्य जल्लोष रंगविणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक सचिन बासरे, सुधीर बासरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कल्याणच्या काळा तलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाजवळ निर्माण करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी कट्ट्यावर हा दोन दिवसांचा साहित्य जल्लोष होणार आहे. या जल्लोषात सहभागी होण्याचे आवाहन गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते व अनुश्री फडणीस यांनी केले आहे.