अ‍ॅपशहर

मुरबाडमधील बाबासाहेबांचे आजोळ आजही सुविधांच्या प्रतीक्षेत!, भिमाई यांचे स्मारक अद्याप कागदावर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६वा महापरिनिर्वाण दिन. मुंबईत दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होत आहे. लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणार असल्याने त्या दृष्टीने महापालिकेने तयारी केली आहे. तसंच रेल्वेकडून व्यवस्था करण्यात आली आहे. पण दुसरीकडे बाबासाहेबांचे आजोळ असलेल्या मुरबाडमधील आंबेटेंभे गाव अजूनही मूलभू सुविधांपासून वंचित आहे.

Authored byश्रीकांत सावंत | महाराष्ट्र टाइम्स 6 Dec 2022, 7:54 am
ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेल्या मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावाला ठाणे जिल्हा प्रशासनाकडून पर्यटनस्थळाचा दर्जा दिला असला, तरी आजही या गावात अनेक मूलभूत सुविधांची प्रतीक्षा कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे. चांगले रस्ते, आरोग्याच्या सोयी, दळणवळणाचे साधने उपलब्ध नसल्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भिमराव आंबेडकर यांचे आजोळ विकसापासून दूर राहिले असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरवर्षी पाच लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी या भागात दाखल होऊन येथील बोधीवृक्ष आणि भिमाई स्मारक मैदान परिसरात येऊन भिमाई यांना अभिवादन करतात. परंतु, या गावामध्ये भिमाई यांचे २०१८मध्ये मंजूर झालेले स्मारक अद्याप कागदावर असून, हे गाव आजही विकासापासून वंचित असल्याची खंत या भागात येणारे आंबेडकर अनुयायी आणि गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhimai smarak in Ambe tembe murbad still on paper
मुरबाडमधील बाबासाहेबांचे आजोळ आजही सुविधांच्या प्रतीक्षेत!, भिमाई यांचे स्मारक अद्याप कागदावर


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट्यवधी अनुयायी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येतात. बाबासाहेबांच्या देश-विदेशातील वास्तू आणि स्मृतींची जपणूक करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. परंतु त्याचवेळी मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे हे गाव डॉ. आंबेडकरांच्या मातोश्री भिमाई यांचे माहेर असलेले गाव आजही विकासापासून वंचित आहे. या गावाला जिल्हा प्रशासनाकडून 'क' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली असून, त्या निधीतून येथील बोधीवृक्षाला चौथरा बांधणे, ध्यानधारणा केंद्र आणि समाजभवन उभारण्यात आले आहे. परंतु, या गावामध्ये येण्यासाठी चांगला पक्का रस्ता नसल्यामुळे येथे येणाऱ्यांची मोठी अडचण होते. कल्याण-मुरबाड आगारातून या भागात जाण्यासाठी एकही एसटी उपलब्ध झालेली नाही. बाबासाहेबांचे आजोळ पाहण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना उत्तम सोय व्हावी, तसेच या परिसरातील चिरड, आगाशी, चेवणे यांसह मोऱ्याचा पाडा, धुकटेवाडी, चेनाची वाडी, झुगरेवाडी, बलीव्हरे या गावातील नागरिकांनाही बस सेवा मिळाण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी व्यापक उपाय योजनांची गरज येथील स्थानिकांकडून सातत्याने व्यक्त होत आहे. आंबेटेंभे गावाकडे जाणाऱ्या मुरबाड, म्हसा दिशेला या गावाची ओळख दर्शवणारा एकही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ते मुरबाड म्हसा कर्जत आंबेटेंभेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिरड फाट्यावर फलक लावण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे.

महामानवाला अभिवादन! महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

'भिमाई स्मारक' पूर्ण व्हावे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाकडून आंबेडकरांच्या अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आठवणींची जोपासना करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मातोश्री भिमाई यांचे माहेर असलेल्या आंबेटेंभे गावामध्ये भिमाईचे भव्य स्मारक उभारण्यासाठी २०१८मध्ये चार कोटी ६६ लाख ६६ हजारांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु, हे स्मारक अद्याप पूर्ण झाले नसून हे स्मारक पूर्ण करण्याची मागणी भिमाई भूमी सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे. याशिवाय विश्रामगृह, बोअरिंग आणि पाण्याची टाकी, संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, आणि आंबेटेंभे येथील जन्मस्थळाचाही विकास होण्याची गरज संस्थेकडून करण्यात आली आहे.

महापरिनिर्वाण दिन; चेंगराचेंगरी सदृश स्थिती टाळण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलिसांचा मोठा निर्णय

महत्वाचे लेख