मटा भूमिका
बस परिवर्तनाचे स्वागत
ठाणे महापालिकेने प्रवासीसंख्या वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून ताफ्यातील बससंख्या व प्रकारात परिवर्तन आणण्यास सुरुवात केली, त्याचे स्वागत. नोकरीधंदे, व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे, त्यानुसार कामाची ठिकाणे आणि लोकवस्तीची ठिकाणेही बदलत आहेत. ठाण्याची हद्द घोडबंदरच्या टोकापर्यंत वाढत आहे. या बदलांना अनुरूप अशी सार्वजनिक वाहतुकीची साधने निर्माण व्हायला हवीत. सध्या सर्वत्र मेट्रो रेल्वेची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे, रस्ते चिंचोळे झाले आहेत. त्याला अनुसरूनच बसचे आकार लहान करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईच्या बेस्ट सेवेने हे बदल केले, तसे ठाणे महापालिकाही आता करत आहे. त्याचाच कित्ता आता इतर महापालिकांनीही गिरवायला हवा. एकाचवेळी वारेमाप बसखरेदी न करता टप्प्याटप्प्याने खरेदी करून प्रवासीसंख्या, मार्ग यांचा अंदाज घेत बदल केले की, एकदम मोठा बोजा अंगावर पडत नाही. ही व्यावसायिकता सार्वजनिक उपक्रमांनी अंगी बाणवली, तर बसमार्ग फायदेशीरही होतील. महापालिकांच्या अनुदानांवरचे अवलंबित्व मग कमी होईल. परंतु महापालिकांनी ही सुविधा मानून त्यांना आधार देणे मात्र क्रमप्राप्तच ठरेल.