जीवनावश्यक वस्तूंसाठी रहिवाशांचा खोळंबा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
सरकारचा जमावबंदीचा आदेश धुडकावून करोनाचा प्रसार होत असतानाही डोंबिवलीत शाही लग्नाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला घरातच विलगीकरण सांगितलेल्या तरुणाने हजेरी लावली आणि सहा दिवसांनंतर हा तरुण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या तिघांना या आजाराची बाधा झाली असून हा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घरातील सिलिंडर संपल्यानंतरही या नागरिकांना सिलिंडर परिसराच्या बाहेर आणावा लागत असून भाजी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूखरेदीसाठी त्यांची दमछाक होत आहे. या परिसरात दररोज एक रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडत आहे. तर, परिसरातील रुग्णाची संख्या वाढल्याने हे नागरिक धास्तावले आहेत.
म्हात्रे नगर परिसरातील लग्न सोहळ्यातच करोनाग्रस्ताने हजेरी लावल्यामुळे डोंबिवलीतील करोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढला. सध्या डोंबिवलीतील करोना रुग्णाची संख्या सहावर पोहोचली आहे. यातील तीन रुग्ण म्हात्रे नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील असल्यामुळे डोंबिवलीकर धास्तावले असून या लग्नाला परिसरातीलच नव्हे तर डोंबिवलीतील सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी हजेरी लावल्यामुळे रुग्णाचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी म्हात्रे नगर परिसरातील सर्वच रस्ते बंद केले असून हा परिसर सील केला आहे. यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवणे कठीण झाले आहे. सोमवारी या परिसरातील जवळपास सात ते आठ नागरिक सिलिंडरची प्रतीक्षा करत सील केलेल्या परिसराच्या बाहेर उन्हात उभे होते. या नागरिकांनी मागील काही दिवसांपासून परिसर सील केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी पायपीट करत बाहेर यावे लागत असल्याचे सांगितले. मात्र मंगळवारी पुन्हा या परिसरात आणखी एक रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांच्या बंदीत भर पडली असून कामासाठीदेखील नागरिक घराबाहेर पडण्यास कचरत आहेत.
म्हात्रे नगरमध्ये करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. या परिसरातील ४० जणांची यादी तयार करून त्यांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. यामुळे हा परिसर संपूर्ण सील करण्यात आला आहे. ही परिस्थिती किती दिवस राहील, हे सांगता येणार नाही. या परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली असून नागरिकांना अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठीच बाहेर पडता येईल.
दिलीप राऊत, अतिरिक्त पोलिस आयुक्त, डोंबिवली