म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महापालिकेच्या शाळेत दुसरीत शिकणारा आठ वर्षांचा मुलगा कळव्यातून अचानक बेपत्ता झाला असून याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा मुलगा आपल्या कुटुंबीयांसह कळवा परिसरात राहत असून त्याचे आई-वडील भंगार वेचण्याचे काम करतात. हाच मुलगा पाच महिन्यांपूर्वी कोणाला काहीच न सांगता घरातून निघून गेला होता. परंतु त्यावेळी तो दोन दिवसांनी घरी आल्याने याबाबत पालकांनी तक्रार केली नव्हती.
१७ जानेवारी रोजी सकाळी हा मुलगा घरातून बाहेर खेळण्यासाठी गेला. मात्र दुपार होऊनही घरी न आल्याने आई त्याला बोलवण्यासाठी गेली. तो कोठेच दिसून आला नाही. आसपास शोध घेऊनही न सापडल्याने कोणीतरी त्याचे अपहरण केल्याचा संशय निर्माण झाला. मात्र, मुलाच्या वडिलांची त्या दिवशी तब्येत बिघडली असल्याने वडिलाला मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे घरातल्यांना मुलाची हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात करता आली नव्हती. मुलाचे वडील रुग्णालयातून घरी आल्यानंतर मंगळवारी आईने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.