अ‍ॅपशहर

डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाण्यात पोहोचता येणार, एप्रिलमध्ये प्रवाशांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता

Motagaon-Mankoli Bridge: ठाणे- डोंबिवली प्रवासाचा वेळ कमी होणार असून माणकोली पूल एप्रिलमध्ये खुला होण्याची शक्यता आहे. तशा सुचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2023, 12:45 pm
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः माणकोली (भिवंडी) ते मोठा गाव (डोंबिवली) या पुलाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली. हा पूल एप्रिलपर्यंत खुला करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यामुळे ठाणे-डोंबिवली प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mankoli bridge


ठाण्याहून डोंबिवलीला रस्तामार्गे जाताना उल्हास नदी लागते. ही नदी ओलांडण्यासाठी सद्य:स्थितीत कल्याणच्या दुगार्डी किल्ल्याखेरीज कुठलाही पूल नाही. त्यामुळे वाहनचालकांना मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून दीड तासांचा प्रवास करून यावे लागते. हा त्रास दूर करण्यासाठीच राजनोलीपासून जवळपास सहा किमी आधी माणकोलीजवळ विशेष पूल उभारला जात आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल संपणार आहे. या पूल उभारणीनंतर ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या २० ते ३० मिनिटांवर येणार आहे.

श्रीनिवास यांनी अधिकाऱ्यांसह या पुलाची पाहणी केली. तसेच डोंबिवली बाजूला जेथे हा पूल संपणार आहे, त्या मोठागाव येथील रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली. तसेच उल्हास नदीवरील पुलाचीही पाहणी केली. या पुलाची उभारणी ८४ टक्के पूर्ण झाली असून एप्रिलपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी तयार करावा, अशी सूचना श्रीनिवास यांनी अधिकाऱ्यांना दिली. या पुलाचे मूळ नियोजन २०१३मधील आहे. त्यानंतर २०१६मध्ये या पुलाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ३६ महिन्यांत उभारणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज