आरोग्य जपा
करोना विषाणूमुळे सध्या जगभर जंतुसंसर्गाची भीती निर्माण झाली आहे. तसे तर एरव्हीही आपल्याकडे अस्वच्छतेमुळे तसेच हवेतील प्रदूषणामुळे पसरणाऱ्या रोगांचे प्रमाण काही कमी नसते. अन्नधान्य, पदार्थ आणि पाण्यातून होणारा जंतुसंसर्ग हा तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कायम चिंतेचा विषय असतो. असे असतानाही आपण रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत निष्काळजी असतो. बाहेर खाद्यपदार्थ खाणे, ही आपली गरज असू शकते. भेसळप्रतिबंधासाठी आपण अन्न व औषध प्रशासनासारखी सक्षम यंत्रणा नेमली आहे. खाद्यसुरक्षा व मानदे यासंबंधीचा कायदा केला आहे. परंतु त्याअंतर्गत होणारी नोंदणी हा केवळ दिखाऊपणा राहत असेल आणि प्रत्यक्ष खाद्यपदार्थविक्री, वितरण यांची तपासणीच होत नसेल, तर या कागदावरच्या नियमांना अर्थ काय, हा प्रश्न उद्भवतो. खाद्यपदार्थांच्या बाबतीत किमान स्वच्छता पाळली जावी, हे अपेक्षित आहे. तेथे वापरले जाणारे पाणी स्वच्छ आहे की नाही, हे पहायला हवे. परंतु या यंत्रणांना तपासणीसाठी वेळ तरी नाही किंवा त्याबाबतीत गाफीलपणा तरी आहे. आपल्यालाही तसा आग्रह धरण्याची सवय नाही. मग इस्पितळाच्या वाऱ्यांशिवाय उरते ते काय ?