म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याणमधून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी भिवंडी तालुक्यातील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडपात सापडल्याने त्याच्या हत्येचा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजीव ओमप्रकाश बीडलान असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संजीत जैसवार, संदीप उर्फ बाळा गौतम, उत्तम जैसवार, राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजीव बिडलान हा कल्याण पश्चिमेला बेतूरकर पाडा परिसरात राहत होता. याच परिसरात राहणारा संजीत जैसवार याला राजीवचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून संजीतने साथीदार संदीप ऊर्फ बाळा गौतम, उत्तम जैसवार, राहुल यांच्या मदतीने राजीवच्या हत्येचा कट रचला. २१ ऑक्टोबर रोजी त्याला घराबाहेर बोलावून घेतले व रिक्षात बसवून लांब नेत त्याची हत्या करत त्याचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडपात फेकून दिला. राजीव घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार महात्मा फुले पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीनुसार तपास करताना त्याची हत्या करून त्याचा मृतदेह भिवंडीत फेकल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस हवालदार धनंजय सोनावले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्येचे गूढ उकलले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.