शिवसेनेच्या भूमिकेवर लढतीचे चित्र अवलंबून
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
भाजपच्या वतीने बेलापूर आणि ऐरोलीमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा होताच नवी मुंबईतील गणेश नाईक समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे थोडासा दिलासा असला तरी गणे नाईक रिंगणात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. तर बेलापूरमधूनच इच्छुक असलेले शिवसेनेचे विजय नाहटा यांनाही धक्का बसला आहे.
एकीकडे शिवसेना-भाजप युतीमध्ये नवी मुंबईतील किमान बेलापूर मतदारसंघ तरी आपल्या पक्षाला मिळेल या नवी मुंबईतील शिवसैनिकांच्या अपेक्षेवर देखील पाणी फेरले गेले आहे. ऐनवेळी बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना भाजपकडून युतीची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीमुळे बेलापूरमध्ये गणेश नाईक आणि शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे विधानसभा निवडणूक लढविण्याचे मनसुबे उधळले गेले आहेत. नवी मुंबई महापालिका हद्दीत येणाऱ्या बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार जाहीर झाल्याने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये डेरेदाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्यात होणाऱ्या संभाव्य लढतीची चुरस अखेर संपली आहे. यापूर्वी बेलापूर मतदारसंघातून नाईक, म्हात्रे आणि नाहटा या तिघांमध्ये गेल्या निवडणुकीत विजयासाठी चुरस होती. त्यात म्हात्रे यांनी बाजी मारली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेलापूरमधून पुन्हा उमेदवारी मिळवून म्हात्रे यांनी नाईक व नाहटा यांना निवडणुकीपूर्वीच रणांगण सोडण्यास भाग पाडले.
आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे युतीच्या माध्यमातून लढत आहेत. त्यामुळे बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या दोन्ही मतदारसंघांमध्ये युतीचे पारडे जड आहे. आता फक्त युतीचा धर्म पाळून शिवसैनिक भाजप उमेदवारांचा प्रचार कसा करतात, त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे.
अन्य पर्याय?
भाजपाची एकच यादी प्रसिद्ध झाली आहे. दुसरी यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये गणेश नाईक यांना एखादा मतदारसंघ मिळू शकेल, या आशेवर समर्थक आहेत. राज्यात १५ वर्षे मंत्रिपद आणि नवी मुंबई महापालिकेची सत्ता एक हाती असतानाही नवी मुंबईचा विकास झाला नाही असे कारण देत नवी मुंबईतील नागरिक व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नाईक यांनी आपला आमदार पुत्र संदीप नाईक व राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांसह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला होता. असे असताना नाईक यांना विधानसभेची उमेदवारी न देऊन भाजपने घराणेशाहीला पक्षात थारा नसल्याचा संदेश दिल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.