अ‍ॅपशहर

नितीन देसाईंचा कारवाईचा इशारा

विहंग डिजिटल वर्ल्ड या कंपनीशी आम्ही कोणताही करार केलेला नव्हता. किंबहुना आम्ही त्यांना ओळखतही नाही. पालिकेच्या प्रकल्पाची जाहिरात पालिका करेल...

Maharashtra Times 19 May 2018, 4:00 am
तक्रार धादांत खोटी असल्याचा पलटवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम art-director-nitin-desai


म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे

विहंग डिजिटल वर्ल्ड या कंपनीशी आम्ही कोणताही करार केलेला नव्हता. किंबहुना आम्ही त्यांना ओळखतही नाही. पालिकेच्या प्रकल्पाची जाहिरात पालिका करेल, आम्ही त्यात ढवळाढवळ कशासाठी करू? तसेच, २००८ सालीच आमचे कार्यालय मुलुंडहून पवईला स्थलांतरित झाले आहे. मग, तक्रार दाखल करणारी मंडळी पैशासाठी मुलुंडच्या कार्यालयात कुणाकडे जात होती, असे अनेक प्रश्न उपस्थित करत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्याविरोधातील तक्रार धादांत खोटी असून तक्रारदाराविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा पलटवार केला आहे.

ठाणे महापालिकेच्या थीम पार्क आणि बॉलिवूड गार्डनच्या उभारणीचे काम नितीन देसाई यांच्या कंपनीला देण्यात आले होते. या प्रकल्पांच्या जाहिरातीच्या कामाचे तब्बल ५१ लाख ७५ हजार रुपये न देता फसवणूक केल्याचा आरोप विहंग डिजिटल वर्ल्डचे प्रमुख राकेश शिंदे यांनी केला आहे. त्याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर देसाई यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर देसाई आणि एनडी आर्ट वर्ल्ड यांच्यावतीने शुक्रवारी आपली बाजू मांडली. या कंपनीशी जाहिरातीसाठी आम्ही कोणताही करार केलेला नव्हता. केला असेल तर तसे कागदपत्र संबंधित कंपनीकडे आहेत का, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे. मात्र, हा करार तोंडी झाला होता, असे तक्रारदार शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकल्पांच्या उभारणीचे काम आमच्याकडे होते. त्याची जाहिरात करायची असेल तर ते काम पालिकेचे आहे, आमचे नव्हे. त्यामुळे असा कोणताही करार आमच्याकडून करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, असे देसाई यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय सरकारचे आर्थिक देवाणघेवाणीबाबतचे कायदे एवढे कठोर झाले असताना असा पद्धतीने लेखी करार न करता कोणीही व्यवहार करू शकत नाही. त्यामुळे शिंदे यांनी दिलेली तक्रार तथ्यहीन असून आमच्या कंपनीची बदनामी करण्यासाठी ती करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

देसाई यांनी दिलेला चेक बाऊंस झाल्यानंतर मी त्यांच्या मुलुंड येथील कार्यालयात गेलो होतो. परंतु, त्यांचे कार्यालय आणि फोन बंद होता, असे शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले होते. मात्र, २००८ सालीच आम्ही मुलुंड येथील कार्यालय बंद केले आहे. जर शिंदे यांनी आमच्याशी व्यवहार केला होता तर आमचे कार्यालय नक्की कुठे आहे याची माहिती त्यांच्याकडे कशी काय नव्हती, असे सवालही उपस्थित करण्यात आले आहे. तक्रारीची प्रत हाती आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांची तत्परता

सर्वसामान्य व्यक्ती चेक बाऊंस किंवा तत्सम तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर न्यायालयात तक्रार दाखल करा असा सल्ला पोलिस देत असतात. मात्र, शिंदे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर पोलिस देसाई यांच्या मुलुंड येथील बंद झालेल्या कार्यालयापर्यंतही पोहचले होते. पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेचे 'कौतुक' होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज