बिबळ्याचा संचार वाढल्याने खबरदारी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ठाण्यातील येऊर आणि मानपाडा परिसरात मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने स्थानिक जातात. पण अनेकांकडे प्रवेश परवाना नसतानाही ते तिथे पोहोचतात. त्यामुळे येथील वनसंपत्तीला नि जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील आठवड्यात येथे बिबळ्याचा वावर आणि एक आठवड्यांपूर्वी बिबळ्याचे पिल्लू सापडले या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येऊरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ठाणेकरांना परवान्याशिवाय प्रवेशबंदी लागू केली आहे. परवान्याशिवाय या परिसरात कोणी आढळल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
येऊर परिसरात लोकांचा वावर वाढल्यामुळे वन्यजीवावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. जंगल परिसरात मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी १८ ते ६० वयोगटातील लोकांसाठी वर्षभराचा २१५ रुपयांचा परवाना असून ज्येष्ठ नागरिकांना २५ रुपयांचा परवाना संयज गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने देण्यात येतो. पण अनेक लोक तो न घेताच फिरण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकला जात असतात. गेल्या चार ते पाच दिवसात ३९ जणांनी नव्याने परवाने घेतले आहेत. बिबळ्याचा गाव परिसरात तसेच रस्त्याच्या बाजूला संचार वाढल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या परवान्यावर प्रवेश करणाऱ्यांना पहाटे पाचनंतर सायंकाळी साडेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. मधुबन गेटमधून येऊरकडे जाणाऱ्यांना संजय गांधी राष्ट्रीयचा अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीवन संरक्षण अधिनियम १९७२, कलम ३५ अन्वये तीन वर्षे कारावास व २५ हजार दंड होऊ शकते.
दहा टक्के वाढ
दरवर्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाकडून देण्यात येणारे परवाने पूर्वी १९५ रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २२ रुपये आकारण्यात येत होते. या शुल्कामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली असून सध्या हे परवाने २१५ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २५ रुपयांना दिले जात आहेत.
सध्या बिबळ्याचा संचार या परिसरात दिसून येत आहे. नागरिकांनी सर्तक राहणे आवश्यक आहे. येऊर परिसरात परवान्याविना प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर
…………………