म. टा. वृत्तसेवा, पालघर
इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे विक्रमगड तालुक्यातील इंदगाव, फणसपाडा, भगतपाडा आणि शेलारपाडा येथे विविध कार्यक्रम उपक्रमांतून पोषण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागासोबत इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन आणि टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांच्या सोबतीने पोषण आहार अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विक्रमगड तालुक्यातील इंदगाव, फणसपाडा, भगतपाडा आणि शेलारपाडा याठिकाणी प्रभातफेरी, आहार प्रदर्शन, पोषणाविषयी चित्रफित प्रदर्शन यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या अभियानामुळे आहारातील पोषणविषयक अपुरे ज्ञान, गैरसमज दूर होण्यास मदत होईल आणि पर्यायाने कुपोषण आणि त्यासंबंधित इतर आजार दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच, ग्रामस्थांसह प्राथमिक शिक्षक भरत मोकाशी यांचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्य सेविका डी. एस. ताराल, इम्पॅक्ट इंडियाच्या जनस्वास्थ्य अधिकारी अनामिक नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी योगेश अभंग हेही उपस्थित होते.
यावेळी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. विविध रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अंगणवाडी देहेर्जे येथेही असाच कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच नंदिनी डोले, शरयू औसरकर, मुख्यसेविका संजीवनी घरत, मुख्याध्यापिका विजया रागशे, शिक्षक मनाली भोईर, विनायक वारघडे, विशाल साळवी, हर्षदा कडव यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले.