म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळबाजारातील वाढता व्यापार पाहता गाळ्यांची, वाहन पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागली होती. शिवाय बाजार आवारात लहानसहान कामांसाठी कार्यालायाची जागा अपुरी पडू लागली होती. त्यामुळे बाजाराच्या आवारात असलेल्या ओपन शेडच्या जागेवर बाजार समितीने बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेतले होते. जून २०१७पर्यंत ते पूर्ण होणार होते; मात्र अजून त्याचे काम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामावर ओपन शेडमधील व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी ओपन शेडमधील व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या लिलावगृह आणि गाळ्यांची रचना चुकीची असून या ठिकाणी व्यापार करणे शक्य होणार नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला. त्यामुळे या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
फळ बाजारात ७३२ मोठे गाळे, तर २९७ लहान गाळे आहेत. आताची व्यापाऱ्यांची संख्याही दुपटीने वाढली आहे. शिवाय बाजारातील इतर सोयीसुविधांसाठी ही जागा अपुरी पडू लागल्याने या बहुउद्देशीय इमारतीचे काम हाती घेण्यात आले. सहा मजल्यांच्या या बहुउद्देशीय इमारतीमध्ये दोन मजले खास पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तळ मजल्यावर ३४ गाळे आणि लिलावगृह उभारण्यात आले आहे. या ठिकाणी बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना गाळे मिळणार आहेत आणि खुला व्यापार करणाऱ्यांना लिलावगृहात जागा मिळणार आहे; मात्र तळमजल्यावर असलेल्या लिलावगृहात माल कसा नेणार आणि खरेदीसाठी येणारे खरेदीदार माल कसा घेऊन जाणार, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय ओपन शेडमधील व्यापाऱ्यांची संख्या ४००च्या घरात आहे. असे असताना केवळ ३४ गाळ्यांची उभारणी कोणासाठी केली आहे, असा प्रश्नही ओपन शेडमधील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय या गाळ्यांची उंचीही कमी असल्याने डोक्यावर माल उचलल्यावर माथाडी कामगारांच्या डोक्याला बांधकाम लागेल, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचेच ओपन शेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम बशिष्ट जैस्वाल यांनी केला आहे.
३९ कोटी खर्च
मार्च २०१२मध्ये फळ बाजारात ही बहुउद्देशीय इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा या ठिकाणी केवळ दोन मजल्यांची इमारत बांधणे ठरले होते; मात्र त्यानंतर या ठिकाणी बाजार समितीचा अतिरिक्त एफएसआय मिळाल्याने तो एफएसआयही वापरण्यात आला. त्यामुळे बांधकाम क्षेत्र वाढले आणि पर्यायाने बांधकामासाठी वाढीव मुदत देण्यात आली. आता जून २०१७पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते . या इमारतीच्या उभारणीसाठी बाजार समितीला एकूण ३९ कोटी खर्च आला. सध्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून रंगकाम, लाद्या बसवणे असे काम बाकी आहे. या इमारतीच्या कामाचा आराखडा तीन वेळा बदलण्यात आला आहे. या बहुउद्देशीय इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर निविदा कडून कार्यालयांचे आणि गाळ्यांचे वितरण केले जाणार आहे, असे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. मात्र ओपन शेडमधील व्यापाऱ्यांना गाळे मिळू नयेत आणि त्यांनी आयुष्यभर गाळे भाड्याने घेऊनच व्यापार करावा, यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.