कळंब, राजोडी येथील जीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा
म. टा. वृत्तसेवा, वसई
वसईतील कळंब आणि राजोडी समुद्रकिनाऱ्यावर तेलाचे थर आणि पाण्यात तेलाचे तवंग दिसून आले आहेत. समुद्रातील प्रदूषण आणि कंपन्यांतर्फे प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाणी तेलकट होत असल्याचे समजते. त्याचा परिणाम सागरी जिवांवरही होत असून मासे मृत होत असल्याचे स्थानिक मच्छिमारांकडून सांगण्यात आले.
वसईतील समुद्रकिनारी पर्यटनासाठी अनेक पर्यटक येत असतात. या समुद्रकिनाऱ्यांना गालबोट लावले आहे, ते येथे होणारे वाळूउपसा, किनाऱ्यावरील कचऱ्याच्या साम्राज्याने. आता यात तेलाच्या तवंगाने भर घातली आहे. वसईतील कळंब आणि राजोडी समुद्रकिनारी पर्यटकांना वाळू तेलकट झाल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियमित स्वच्छता अभियान राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनीदेखील याबाबत माहिती देताना सांगितले की, कळंब आणि राजोडी किनाऱ्यावर गेले असता त्यांना किनाऱ्यावरील वाळू तेलकट लागली. बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर तेलाचे थर आढळले. एवढेच नव्हे तर वाळू आणि तेलाचे लहान लहान गोळे झालेले देखील पाहावयास मिळाले. त्यामुळे असे तेलकट झालेले पाणी समुद्री जिवांना आणि एकूणच पर्यावरणाला घातक असते, असेही त्यांनी सांगितले.
तेल सर्वेक्षणामुळे तेलाचे तवंग
विविध तेल कंपन्यांच्या समुद्रातील सर्वेक्षणामुळे असे तेल किनाऱ्यावर आले आहे. असे मच्छिमार निनाद पाटील यांनी सांगितले. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे हे तेल समुद्रावर येते. यामुळे समुद्रातील मासे मरतात, असेही त्यांनी सांगितले.
जीवसृष्टीला धोक्याची घंटा
वसईच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर डॉल्फिन, व्हेल आणि दुर्मीळ प्रजातीचे कासव मृतावस्थेत आढळून आल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे या प्रदूषणाचेच दुष्परिणाम असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. वसईचे समुद्रकिनारे अशा प्रकारे दूषित होणे ही धोक्याची घंटा असून प्रशासनाने वेळीच कारवाई करून ते थांबवायला हवे, असे वसईतील पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी सांगितले.
रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडल्याचा परिणाम
औद्योगिक वसाहतीत सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने नैसर्गिक नाल्यांमध्ये बाराही महिने हे पाणी वाहताना दिसते. विशेष म्हणजे वसईतील औद्योगिक वसाहतींमधून तेलयुक्त पाणी उघड्यावर सोडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. पाणी उघड्यावर सोडल्याने ते नाल्याला जाऊन मिळते. नाल्यातील पाणी खाडीमध्ये जाऊन मिसळते आणि खाडीतील पाणी नद्यांमध्ये आणि समुद्रामध्ये मिसळते. यामुळेच वसईतील अनेक खाड्या आणि समुद्रकिनारे प्रदूषित झाले आहेत. यासाठी पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या कंपन्यांनी हे सांडपाणी प्रक्रिया करूनच बाहेर सोडावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कारवाईचा बडगा उगारत गेल्या तीन महिन्यांत १६ कंपन्यांवर कारवाई केल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले.