अ‍ॅपशहर

जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर

मध्य रेल्वेच्या मार्गासाठी धोकादायक ठरणारा पत्रीपुलाचे तोडकाम रविवारी पूर्ण झाले असून नव्या पुलाची जुळवाजुळव सुरू असतानाच कल्याण पलिकडे असे जुने सहा पूल जीर्ण झाल्याचे निरीक्षण प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आले आहे. वालधुनी, उल्हासनदी, काळूनदी आणि भातसा या नद्यांमध्ये बांधण्यात आलेले....

Maharashtra Times 19 Nov 2018, 1:35 am
कल्याण-कसारादरम्यान सहा जुने पूल जीर्ण अवस्थेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम old bridges question on anecdote
जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

मध्य रेल्वेच्या मार्गासाठी धोकादायक ठरणारा पत्रीपुलाचे तोडकाम रविवारी पूर्ण झाले असून नव्या पुलाची जुळवाजुळव सुरू असतानाच कल्याण पलिकडे असे जुने सहा पूल जीर्ण झाल्याचे निरीक्षण प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आले आहे. वालधुनी, उल्हासनदी, काळूनदी आणि भातसा या नद्यांमध्ये बांधण्यात आलेले पूल अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये सेवा देत आहेत. जून महिन्यामध्ये प्रवासी संघटनांकडून या भागातील रेल्वे पुलांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी सहा पुलांची यादी तयार करून रेल्वे प्रशासनाकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये पत्री पूल, वालधुनी पूल, शहाड-आंबिवली पूल, टिटवाळा पूल, आसनगाव पूल आणि आटगाव पुलाचा समावेश होता. यापैकी पत्रीपूल जमीनदोस्त करण्यात आला असला तरी उर्वरित पुलांचा प्रश्न कायम आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीतील पूल कोसळल्यानंतर रेल्वे प्रवासी संघटनांकडून जून महिन्यांमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर कल्याणपलिकडच्या रेल्वे पुलांची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये सहा पुलांचा समावेश करण्यात आला होता. रेल्वेकडून या पुलांना कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे पूल सुरक्षित असल्याचा दावाही करण्यात आला होता. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी यासंदर्भात रेल्वेचे सर्व पूल सुरक्षित असल्याचा दावा केला होता. तसेच या भागातील सर्व पुलांचे रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यानंतर, पाण्याच्या बाहेर, पाण्याच्या आतील भागात सर्वेक्षण केले जाते. त्याची स्थिती योग्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अंधेरी पुलाची दुर्घटना झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या हद्दीतील अनेक जुन्या पुलांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी पत्रीपूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्याणपलिकडील अन्य पुलांचे सर्वेक्षण होण्याची गरज असून त्यांचीही क्षमता संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी या भागातील प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

कल्याण-कसारा दरम्यानच्या ६८.६२ किमी रेल्वे रुळादरम्यान १२ स्थानके असून आठ मोठे पूल आहेत. तर लहान आकाराचे ११९ असे एकूण २०७ पूल या भागात आहेत. या पुलांपैकी सहा पूल अत्यंत जीर्ण झाले असल्याची शक्यता प्रवासी संघटनांच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यामध्ये भातसा नदीतील वाशिंद येथील पुलाचे चिरे निखळले आहेत, असे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रिटीशकालीन पूल जीर्ण…

मध्य रेल्वेकडून पाडण्यात आलेला पत्रीपुल ब्रिटीशकालीन असून १९१४ साली बांधण्यात आला होता. अशाच प्रकारचे शेकडो पूल कल्याण परिसरात अस्तित्वात असून पहिल्या महायुद्धासाठी या पुलांची निर्मिती ब्रिटिशांकडून करण्यात आली होती. अत्यंत कमी वेळात हे पूल बांधण्यासाठी पूर्णपणे लोखंडी गर्डरचा वापर करण्यात आला होता. अशाच प्रकारचा पूल दुर्गाडीजवळ आहे. तर कल्याण परिसरात असे अनेक जुने पूल आजही जीर्ण अवस्थेत उभे आहेत. त्यांची डागडुजी किंवा पर्यायी पुलांची निर्मिती करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज