दिवसभर महावितरणचा असहकार
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
गणेशोत्सवाच्या काळात दिव्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची सूचना मुंब्रा पोलिसांकडून महावितरणला देण्यात आल्यानंतरही रविवारी संपूर्ण दिवस दिवा परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या दिवावासींना अंधारामध्येच तयारी करण्याची वेळ आली होती. सजावटीसाठी आवश्यक वीजपुरवठा नसल्याने दिवावासीयांनी महावितरणविरोधात संताप व्यक्त केला. महावितरणकडून होणारा हा असहकार अत्यंत भीषण असून त्यामुळे दिवावासींमध्ये संतापाचा उद्रेक होण्याची भीती आहे. वारंवार तक्रारी करूनही दिवावासींवर अन्याय होत असून यामध्ये प्रामाणिक वीजग्राहक भरडले जात असल्याचा संताप दिव्यातील नागरिकांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर गणपतीच्या तयारीसाठी अबालवृद्ध कामाला लागले असून सजावटीसाठी सर्वत्र गडबड सुरू होती. परंतु दिव्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे येथे महावितरणच्या नावाने संताप व्यक्त करण्यात येत होता. सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत शहरात वीज न आल्याने गणेशोत्सवाची संपूर्ण तयारी अडकून पडली होती. सार्वजनिक गणेशोत्सवांचीही त्यामुळे कोंडी निर्माण झाली होती. ही परिस्थिती अशीच राहिल्यास दिवावासींच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली. दिव्यात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे वीज ग्राहक संतप्त आहेत. काहींनी रास्ता रोकोसारखेही आंदोलने या पूर्वी केली असल्यामुळे दिव्यात मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंब्रा पोलिस प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आगोदर मुंब्रा पोलिसांकडून महावितरणला पत्र देऊन पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यानंतरही महावितरणचे वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रमाण कायम होते. या प्रकरणी दिव्यातील नागरिकांनी तक्रार करूनही कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार त्यांनी 'मटा'कडे केली.