अ‍ॅपशहर

​ क्षारयुक्त पाण्यामुळे नापिकी

डहाणू नगरपालिका क्षेत्र व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये समुद्राच्या भरतीच्या वेळी क्षारयुक्त पाणी शिरून भातशेती नापीक बनत चालली आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यानंतर विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी मचूळ बनण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

Maharashtra Times 16 Feb 2017, 4:01 am
डहाणूतील शेतकऱ्यांपुढे चिंता, ठोस उपाययोजना करण्याची मागणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम palghar dahani sea water entry makes farmland barren
​ क्षारयुक्त पाण्यामुळे नापिकी


नरेंद्र पाटील, पालघर

डहाणू नगरपालिका क्षेत्र व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये समुद्राच्या भरतीच्या वेळी क्षारयुक्त पाणी शिरून भातशेती नापीक बनत चालली आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यानंतर विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी मचूळ बनण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डहाणू नगरपालिका क्षेत्राअंतर्गत आगर आणि मसोली हा भाग येतो. येथील चंद्रसागरनजिक पावडी पुलाच्या झडपा पावसाळा संपल्यानंतर बंद न केल्याने डहाणू खाडीच्या मार्गाने भरतीचे क्षारयुक्त पाणी भातशेतीत शिरून जमीन नापीक बनत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला भौगोलिक महितीचा अभाव असल्याचे दिसते. पावसाळ्याच्या चार महिन्यात झडपा खुल्या करून, पावसाळ्यानंतर भरतीचे आत येणारे खारे पाणी रोखण्यासाठी झडपा बंद केल्या पाहिजेत. मात्र नेमकी उलट प्रक्रिया केली जात असल्याने पावसाळ्यात भात खाचरात पुराचे पाणी तुंबून उभे भात पीक कुजून जाते. उलट उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या भरतीच्या वेळी क्षारयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीचा पोत बिघडून शेतकऱ्यांचे परिश्रम वाया जात आहेत.

जानेवारीनंतर पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी मचूळ बनण्यास प्रारंभ होतो. क्षारयुक्त पाण्याच्या शिरकावाने यामध्ये आणखी भर पडते. त्यामुळे नागरिकांमध्ये घसा आणि मुतखाडा विकारांचे प्रमाण वाढत आहे.

ही स्थिती किनाऱ्यालगतच्या नरपड, चिखले आणि घोलवड गावांमध्ये दिसून येते. खारे पाणी रोखण्यासाठी चिखले ग्रामपंचायतीने नरपड गावच्या हद्दीत बांधकाम केले. मात्र क्षारयुक्त पाण्याने भातशेतीत शिरकाव केल्याने नियोजनाअभावी केलेल्या बांधकामाने शासनाचा पैसा वाया गेला आहे. याबाबत स्थानिकांनी प्रशासनाच्या विविध विभागांकडे अर्जाद्वारे समस्या मांडल्यानंतरही दखल घेतली गेलेली नाही.

...हा तर कुटील डाव

तीन वर्षांपूर्वी डहाणू रोड रेल्वे स्थानकाला उपनगरीय दर्जा देण्यात आला. जिल्हानिर्मितीनंतर पालघर येथील मुख्यालयात कामकाजास प्रारंभ झाला आहे. या काळात डहाणू नगरपालिका क्षेत्रालगतच्या गृहसंकुलांना मागणी वाढली आहे. शिवाय सेकंड होमच्या नावाखाली किनाऱ्यालगत हॉटेल व बंगले बांधण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे एकीकडे अतिरिक्त जागेची आवश्यकता निर्माण झाली असताना, दुसरीकडे भात शिवारे क्षारयुक्त होणे न रोखल्यास शेतकरी नापिकीला कंटाळून जमीन कसणे सोडून ती विकतील. अशा पद्धतीने बांधकाम व्यवसायिकांसाठी स्वस्तात व विनासायास जमिनीचा पर्याय उपलब्ध होईल, असा कुटील डाव संगनमताने आखला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. डहाणू नगरपालिका आणि पंचायत समितीने तत्काळ उपाययोजना अमलात न आणल्यास आगामी काळात डहाणूतील प्रशासनाला शेतकऱ्यांच्या उठावाला सामोरे जावे लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज