अ‍ॅपशहर

​ पिंजाळ बंधाऱ्याला गळतीचे ग्रहण

वाडा आणि विक्रमगड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पिंजाळ नदीवर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यासह सर्वच बंधाऱ्यांना सध्या गळतीचे ग्रहण लागले असून पाणी अडविण्यासाठी सरकारने केलेल्या खर्च बरोबरच पाणीही वाया जात आहे.

Maharashtra Times 16 Feb 2017, 4:01 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम palghar pinjal dam leakage
​ पिंजाळ बंधाऱ्याला गळतीचे ग्रहण


वाडा आणि विक्रमगड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पिंजाळ नदीवर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यासह सर्वच बंधाऱ्यांना सध्या गळतीचे ग्रहण लागले असून पाणी अडविण्यासाठी सरकारने केलेल्या खर्च बरोबरच पाणीही वाया जात आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही, पाण्याच्या नियोजनाअभावी गेली अनेक वर्षे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

वाडा व विक्रमगड तालुक्यातील पिंजाळ नदीवर मुंबईसाठी पिंजाळ प्रकल्प बांधण्यात येणार आहे. मात्र त्याच पिंजाळ नदीवर असलेले अनेक बंधारे हे निकृष्ट कामामुळे खराब झाले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे अनेक गावपाड्यांना उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

वाडा तालुक्यातील सापने ग्रामपंचायत हद्दीतील करांजे गावाजवळील पिंजाळ नदीत दोन वर्षांपूर्वी ककण पाटबंधारा बांधण्यात आला आहे. मात्र निकृष्ट कामामुळे या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या बंधाऱ्यामुळे वाडा तालुक्यातील करांजे, उमरोठे ही दोन गावे व पाच- सहा पाड्यांचा तर विक्रमगड तालुक्यातील कावळा गाव आणि चार-पाच पाड्यांच्या पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार होता. मात्र हा बंधारा दोन वर्षांतच खराब झाल्यामुळे या गावांना पिण्याच्या आणि शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. तसेच निकृष्ट कामामुळे सरकारचे लाखो रुपये हे पाण्यातच गेले आहेत.

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच नदीनाल्यांचे जाळेही चांगले आहे. मात्र नियोजनाअभावी तसेच प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार वृत्तीमुळे उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन बंधारे दुरुस्त करावेत. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक करवाई करावी.

अमोल सांबरे, उपाध्यक्ष, युवा स्पर्श सामाजिक संस्था

आमच्या करांजा गावाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पिंजाळ नदीवरील बंधाऱ्यामुळे करांजेसह आजुबाजूच्या गाव-पाड्यांना फायदा होईल, असे वाटत होते. मात्र निकृष्ट कामामुळे बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बंद केलेल्या दरवाजांमधूनही पाणी गळत आहे. या बंधाऱ्याचा आम्हाला काहीही फायदा झालेला नाही.

सदू डोंगरकर, ग्रामस्थ, करांजा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज