पालघर : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील महावितरण कंपनीची वीजपुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली असून, त्या भागातील वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी पालघर जिल्ह्यातून महावितरण कंपनीचे २१ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोकणातील वादळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. महावितरणचे पालघर विभागातील डेप्युटी एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर, तीन असिस्टण्ट इंजिनीअर, दोन ज्युनिअर इंजिनीअर, एक लाइन इन्स्पेक्टर, एक मुख्य तंत्रज्ञ, आठ वरिष्ठ तंत्रज्ञ, पाच तंत्रज्ञ असे एकूण २१जण रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या पेण सर्कलमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले आहेत, असे महावितरण कंपनीतर्फे सांगण्यात आले.