म. टा. वृत्तसेवा, पालघर
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मोखाडा तालुक्यातील शिक्षकांनी निर्मिलेल्या 'मधली सुट्टी- एक प्रवास' या लघुपटाच्या टीमचा नुकताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गौरव करण्यात आला. हा लघुपटाची नायजेरिया येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
दर तीन महिन्यांनी पार पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लोकोपयोगी कामांबाबतचे महत्त्वाचे निर्णय व योजना आखल्या जातात. मात्र शुक्रवारीस २१ डिसेंबर रोजीची सर्वसाधारण सभा थोडीशी वेगळी ठरली. यावेळी मोखाडा तालुक्यातील 'मधली सुट्टी - एक प्रवास' या लघुपटात काम करणाऱ्या विकास या बालकलाकाराचा व लघुपटाची निर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले आदी प्रमुख उपस्थित होते.
आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुके अतिदुर्गम मानले जातात. या भागात रोजगार, शेती, शिक्षण यांसारख्या समस्या पाचवीला पुजल्या आहेत. बिवलपाडा हे असेच मोखाडा तालुक्यातील दुर्गम व खोल दरीत, डोंगरात वसलेले गाव. येथेही मुलांच्या शिक्षणाची समस्या भेडसावते. मुलांची गैरहजेरी, दुपारी सुट्टीनंतर शाळेत न येणे यांसारख्या समस्यांचा येथील शिक्षकांच्या टीमने एकत्र येऊन अभ्यास केला.
दुपारच्या सुट्टीनंतर विकास शाळेतून घरी पळून जायचा. शिक्षकांच्या टीमने याचा मागोवा घेतला असता विकासचे वडील व्यसनाने पछाडलेले असल्याने त्यांचे घरी लक्ष नसल्याचे आढळले. आईचे निधन झालेले, घरी दोन लहान भावंडे... या भावडांना काही तरी खायला मिळावे म्हणून विकास मधली सुट्टी झाली की शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहारातील खिचडी घेऊन शिक्षकांची नजर चुकवून घरी पळून जात असे आणि ही खिचडी भावंडांना खाऊ घालत असे. समोर समस्यांचा डोंगर उभा असताना विकासची जीवन जगण्यासाठी सुरू असलेली धडपड या शिक्षकांच्या टीमने जवळून अनुभवली आणि या समस्येवर काही तरी मार्ग निघावा व पालकांचे प्रबोधन करता यावे, यासाठी थेट या विषयावरच 'मधली सुट्टी - एक प्रवास' नावाचा लघुपट तयार केला. अनेक स्पर्धांमध्ये या लघुपटाने आपला ठसा उमटवला आहे.
या लघुपटात विकास वाजे, रविराज वाजे, सूरज वाजे या बालकलाकारांसह प्रवीण घुले, प्राथमिक शिक्षक (जि. प. शाळा, स्वामीनगर), लक्ष्मण ढोरकुले प्राथमिक शिक्षक, (जि.प. शाळा ठाकूरवाडी), शिवाजी बचकर, प्राथमिक शिक्षक (जि. प. शाळा धामोडी), भिला बच्छाव, पदवीधर शिक्षक (जि. प. शाळा, आसे ), दत्तू गोराळे, प्राथमिक शिक्षक (जि. प. शाळा आसे), सतीश ओतारी, प्राथमिक शिक्षक (जि. प. शाळा आसे), लहू वाजे (गावकरी) यांनी काम केले आहे. तर, छायाचित्रण व संकलन सागर महाजन (शिक्षक) व विजय शितोळे (शिक्षक) यांनी केले आहे. लघुपटाचे संवाद नवीनकुमार कलदुरके (जि. प. शाळा बिवलपाडा) यांनी केले असून संकल्पना, कथा, पटकथा, निर्माता व दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल गणेश सूर्यवंशी यांनी सांभाळली आहे.