परदेशातील पाल्यांच्या चिंतेने कासावीस
म. टा. वृत्तसेवा, ठाणे
महाराष्ट्रात आणि ठाणे-डोंबिवली भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद पाळण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, इथल्या अनेक पालकांचे डोळे मात्र साता समुद्रापार असलेल्या आपल्या मुलांकडे लागले आहे. परदेशात विलगीकरण अधिक काटेकोरपणे होत असले, तरी आपल्या मुलांना किंवा परदेशस्थित भावा-बहिणींना रोजच्या वस्तू, अन्नधान्य मिळत असेल ना, याकडे भारतातील अनेक घरातून कानोसा घेणे सुरू आहे.
परदेशात विलगीकरण कसोशीने पाळताना दिसताहेत. अनेक जण घरात बसून काम करत आहेत, तर शाळा-कॉलेजला सुट्टी असल्याने तरुण मंडळीही घरातच बसून आहेत. यासंदर्भात कल्याणच्या अनिल साठे यांनी सांगितले की, 'माझा मुलगा फ्लोरिडा येथील गेन्सविले शहरात शिकत आहे. आम्ही रोजच त्याच्या संपर्कात आहोत. ११ तारखेपासून त्याचे कॉलेज बंद आहे. पण ऑनलाइन लेक्चर सुरू आहेत. अमेरिकेत तसेही लोक आयसोलेटेडच असतात. सुदैवाने माझा मुलगा आणि त्याचा एक मित्र असे दोघेच राहतात. दोघांना स्वतंत्र खोल्या आहेत. त्यामुळे आपापल्या खोलीत बसून कामे करत आहेत.'
परदेशात वास्तव्य असणाऱ्या लोकांनी आपल्या अत्यावश्यक गोष्टींचा साठा आधीच करून ठेवला आहे. त्यामुळे सतत बाहेर पडण्याची वेळ येत नाही. कल्याणच्या मकरंद पुंडलिक यांनी सांगितले की, 'कॅनडाच्या बॉर्डरवरील शहरात माझ्या मुलाचे विद्यापीठ आहे. गावापासून तशी लांब असल्याने तसा धोका येथे कमी आहे. पण आम्ही सतत सांगतो आहोत की स्वत:ची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका. कारण धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यांच्या शहरात करोनाची लागण झालेले २७ जण आढळले आहेत. त्यांची योग्य ती काळजी सरकार घेते. आता त्याची इंटर्नशिप सुरू होणार होती. पण त्या कंपनीने ७ एप्रिलनंतर पुढील प्रक्रिया होईल असे सांगितले आहे.' श्रीदेवी सूर्यवंशी यांनी सांगितले की, 'माझा मुलगा आणि मुलगी दोघेही परदेशात आहेत. मुलगी बोस्टनला असते. पण सध्याची परिस्थिती बघता ती आपल्या दादाकडे न्यूयॉर्कला राहायला गेली आहे. ते दोघे एकत्र असल्याने माझी काळजी थोडी कमी झाली आहे.'
भारतात लॉकडाऊन होणार का याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पण परदेशातले लोक ही वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी स्वत:हून घेताना दिसताहेत. ठाण्याचे टीआयएफआरमधील निवृत्त अधिकारी अजित घांग्रेकर यांनी सांगितले की, 'माझा मुलगा, सून आणि नातू कॅनडामध्ये आहेत. गरज असेल तरच लोक तिथे घराबाहेर पडताहेत. माझ्या ९ वर्षांच्या नातवाच्या शाळा कम पाळणाघराला तर सुट्टीच देण्यात आली आहे. कालच कंटाळा आला म्हणून सून आणि नातू घराबाहेर एक फेरी मारून आले. योग्य ती स्वच्छता आणि काळजी तिथले लोक घेताहेत. "
सतत प्रसारमाध्यमांवर, मोबाइलवर, लोकांमध्ये करोनाचीच चर्चा आहे. त्यामुळे भीती आणखीच वाढत आहे. याविषयी ठाण्याच्या जान्हवी कुलकर्णी यांनी सांगितले की, 'माझी बहीण आणि भाचा दुबईमध्ये आहेत. सतत करोनाविषयी बोलून भीती पसरवण्यापेक्षा आम्ही रोज फोन करतो. पण वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. भाच्याच्या शाळेला सुट्टी असल्याने आणि बहिणीला घरूनच काम करायचे असल्याने दोघे फक्त मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडतात. बाकी संपूर्ण दिवस घरातच बसून राहतात.' तर कळव्याच्या वैदेही देशपांडे यांनी सांगितले की, 'माझे पती दुबईला असतात. आमच्या मुलाच्या मुंजीच्या आधीच्या सोहळ्यासाठी येत्या २७ तारखेला ते भारतात येणार होते. पण त्यांचे तिकीट कॅन्सल झाले आहे. माझ्या पतीचे ऑफिसही अजून सुरू आहे. बस ऑफिसच्या दारात थांबली की त्यांना सॅनिटायझर दिले जाते. त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचे तापमान रोज तपासले जाते. ऑफिसमधूनच मास्क, सॅनिटायझर पुरवले जातात. मेसमध्ये जेवतानाही गरम गरम अन्न पोटात कसे जाईल, याकडे त्यांचे लक्ष आहे.'