स्वच्छता पंधरवड्यातून वास्तव समोर
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकबंदी झाली तरी रेल्वे हद्दीतील प्लास्टिकचा कचरा अद्याप संपलेला नसून ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा उचलण्याची वेळ अधिकारी आणि प्रवासी संघटनांवर आली होती. प्लास्टिकच्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचे यामध्ये सर्वाधिक प्रमाण होते. तर खाद्यपदार्थांचे रॅपर, प्लास्टिकच्या पिशव्या, चॉक्लेट, गोळ्यांची आवरणे अशा कचऱ्याचेही प्रमाण अधिक होते. रेल्वेहद्दीतील प्लास्टिक रेल्वे रुळांवर आल्यामुळे पाणी साठून वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका वाढत आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने रेल्वे प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत असून प्रवासी संघटना आणि अधिकारी वर्गाकडून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि रेल्वे अधिकारी रेल्वे रुळांवर उतरून स्वच्छता मोहीम राबवली. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांवर कचरा उचलण्यासाठी सक्रिय झालेल्या या सदस्यांना यावेळी सर्वाधिक प्लास्टिक कचऱ्याचा सामना करण्याची वेळ आली होती. प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. 'रेल्वे नीर'च्या बाटल्यांबरोबरच अनेक परवानगी नसलेल्या कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांचाही कचरा यामध्ये होता. याशिवाय खाद्यपदार्थांच्या आवरणांचाही कचरा मोठा होता. अतिवृष्टीच्या काळामध्ये प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यामध्ये नाले तुंबण्याचे प्रमाण वाढते. ठाणे परिसरात पावसाळ्यात चार ते पाच वेळा पाणी तुंबल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. प्लास्टिक हेच कारणीभूत असल्याने वापरावर कडक निर्बंधाची गरज व्यक्त करण्यात आली. मंगळवारी सुमारे ३० ते ४० स्वयंसेवकांनी मिळून हा कचरा बाहेर काढला. परंतु पुन्हा या ठिकाणी कचरा पडणे थांबवण्याची गरज प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्लास्टिकचा सर्वाधिक कचरा दिसल्यामुळे येथील पाणी तुंबण्यामागे हे गंभीर कारण आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
नंदकुमार देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना