भाजप उपाध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती याचिका
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेच्या भावी महापौर पंचम कलानी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका अखेर न्यायालयाने फेटाळली. पंचम कलानी यांच्या विवाहाचा मुद्दा उपस्थित करत खुद्द भाजपच्याच उपाध्यक्षांनी पंचम यांच्या महापौरपदावर गदा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भाजप आणि ओमी कलानी चमू यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर मीना आयलानी यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आपल्या महापौरपदाचा राजीनामा महासभेत आयुक्तांकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे पंचम कलानी यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. मात्र भाजपचे शहर उपाध्यक्ष कमल भटीजा आणि कलानी कुटुंबाचे अनेक काळापासून वैर आहे. त्यामुळे कमल भटीजा यांनी पंचम कलानी यांना महापौरपद मिळू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ओमी कलानी यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून कायदेशीर फारकत घेतली नसून, पंचम कलानी या त्यांच्या दुसरी पत्नी आहे. त्यामुळे ओमी कलानी यांचा विवाह बेकायदा असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कमल भटीजा यांची याचिका फेटाळून लावली. याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारले असता, या प्रकरणी आपल्याला कल्पना नाही, मात्र असा प्रकार झाला असेल तर त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करत या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
आमच्या राजकीय विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेविरोधात दिलेला निर्णय योग्य आहे.
- ओमी कलानी