म. टा. वृत्तसेवा, पालघर
ठाणे जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळ (रजि.) या संस्थेच्या वतीने रविवारी बोईसर येथील स्व. किशोर ग. संखे सभागृहात साहित्यिक डॉ. अ. ना. रसनकुटे, यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले कविसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी वंजारी समाजाच्या दिव्यांग साहित्यिका, कवयित्री अनुजा किरण संखे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मंडळाचे अध्यक्ष दशरथ संखे, सरचिटणिस महादेव पाटील, खजिनदार मुकेश संखे, महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव आर. डी. संखे, संतोष संखे, डॉ. के. डी. संखे, साहित्यिक समिती प्रमुख व साहित्य समिती सचिव बी. डी. संखे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. के. डी. संखे लिखित 'दाजिबाचा जीव' या एकांकीचे प्रकाशन डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष दशरथ संखे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. वंजारी समाजाचे हे पहिलेच कविसंमेलन असूनही यावेळी २०० हून अधिक लोक उपस्थित होते. तर ५० कविंनी यामध्ये स्वरचित कविता सादर केल्या.