वेध मतदारसंघाचा- भिवंडी पूर्व
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ समस्यांनी ग्रासला आहे. या समस्यांना तोंड देत येथील जनता कसेबसे दिवस ढकलत असून त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. लोकप्रतिनिधी तसेच पालिका अधिकारी येतात जातात. मात्र समस्यांचे शुक्लकाष्ट काही संपत नसून दुर्गंधीपासून ते खराब रस्ते, पाण्याची समस्या आदी अनेक प्रश्न या मतदारसंघात आ वासून उभे आहेत.
भिवंडी पूर्व मतदारसंघात शांतीनगर, गैबीनगर, गायत्रीनगर, भादवड, पिराणीपाडा आदी अनेक भागांचा समावेश आहे. पॉवरलूमची संख्या अधिक असल्याने कामगार वस्तीही बऱ्यापैकी आहे. येथील वस्ती संमिश्र स्वरूपाची असून उदरनिर्वाहासाठी कामगार परराज्यातून भिवंडीत दाखल झाला आहे. परंतु पॉवरलूम कारखान्यांनाही टाळे लागल्याने कामगार वर्ग स्थलांतर होत असला तरी भिवंडीतील प्रत्येक प्रभाग अडचणींचा सामना करत आहे. काही भाग उंचावर असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी पोहोचतो. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येत असून अनेकदा एक दिवसाआड पाणी येत असल्याचे सांगितले जात आहे. पाणीप्रश्न कायमचा सोडवण्याविषयी संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. जंतूनाशकाची फवारणी होत नसल्याने आजार बळावण्याची भीती व्यक्त होत असून रस्त्यावरील खड्ड्याची समस्या भिवंडीकरांच्या पाचवीलाच पुजली आहे. चांगले रस्ते भिवंडीकरांना कधी मिळणार, असा प्रश्न येथील जनता विचारू लागली आहे. सरकारी आरोग्ययंत्रणाही सक्षम नाही. गंभीर आजा रांवरील उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात किंवा मुंबईला रुग्णांना धाव घ्यावी लागत आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र सरकारी यंत्रणांना याचे काहीच सोयरेसुत नसल्याचा आरोप होत आहे. कचरा समस्याही दिसून येते. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा पडलेला असल्याने दुर्गंधी पसरत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व समस्या असताना स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहेत. तसेच पालिका प्रशासनही लक्ष देत नसल्याने भिवंडी शहराचीच परिस्थिती बिकट झालेली आहे. या मतदारसंघातही वाहतूककोंडी असून त्यामुळे कोंडीत वाहनचालकांना बराच वेळ तिष्ठत रहावे लागत आहे. मोठ्या प्रमाणावर भिवंडीत समस्या असतील तर विकास कामासाठी येणारा निधी जातो कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.