म. टा. वृत्तसेवा, वसई
ग्रंथाली प्रकाशन संस्थेतर्फे कवी सायमन मार्टिन यांच्या 'पुनरुत्थान' या आठव्या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ६ ऑक्टोबर रोजी वसई साहित्य कला महोत्सवामध्ये हे प्रकाशन संपन्न होणार आहे.
यावेळी कार्यक्रमास ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वनाधिपती विनायक पाटील, अविनाश कोल्हे, शशिकांत लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायमन मार्टिन यांच्या कवितेच्या जाणिवेची जडण-घडण ही पुरोगामी विचार, तत्त्वज्ञान, सामाजिक उत्थानाचे लढे, मूल्यव्यवस्था या सर्व घडामोडींतून आकारास आलेली आहे. त्यामुळे ती वाचकाला परिवर्तनाची वाट दाखवणारी सामाजिक संघर्षात समताधिष्टीत मूल्यांचा आग्रह धरणारी आहे. तसेच समाजाच्या व्यथा वेदनांच सजग भान देणारी आहे. लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी हे त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आहे.
'पुनरुत्थान' या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता ही स्वतंत्रपणे वेगवेगळी अनुभूती देणारी आहे. कवितेतील भाषा आणि भाषेची आवाहकता, विशिष्ट सूत्र वाचकाला चिकित्सक भान देते. चंगळवादी आणि माध्यम प्रभावित संस्कृतीमुळे माणसाची नैतिक बैठकही हरवली आहे. त्याने माणसा-माणसामधला संवाद, आत्मियता, परस्पर आस्था संपली आहे. सर्वत्र आत्मकेंद्री, स्वार्थाध, संवेदनाशून्य मानसिकता बोकाळली आहे. एकीकडे वाढता भोगवाद आणि दुसरीकडे वाढता बकालपणा आणि एकटेपणा यांनी जीवनातले स्वास्थ्य हरपल आहे. हेही कवितेतून मांडल गेले आहे.