अ‍ॅपशहर

‘मूल्यमापना’चे तीन तेरा

सीलबंद पाकिटातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या पेपरफुटीचा मनस्ताप होत असतानाही सरकारस्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत गोपनीयता पाळली जात नसल्याचे उघड झाले आहे. ६ आणि ७ एप्रिल रोजी शालेयस्तरावर होणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाऱ्या समतुल्य मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थीसंख्येपेक्षा कितीतरी कमी पाठविल्या जात आहेत.

Maharashtra Times 5 Apr 2017, 3:00 am
शाळांकडे अपुऱ्या, सीलबंद नसलेल्या प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम question papers of evalauation test not sealed
‘मूल्यमापना’चे तीन तेरा

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

सीलबंद पाकिटातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या पेपरफुटीचा मनस्ताप होत असतानाही सरकारस्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत गोपनीयता पाळली जात नसल्याचे उघड झाले आहे. ६ आणि ७ एप्रिल रोजी शालेयस्तरावर होणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाऱ्या समतुल्य मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थीसंख्येपेक्षा कितीतरी कमी पाठविल्या जात आहेत. तसेच, या प्रश्नपत्रिका बंडल स्वरूपात पार्सल केल्या जात असल्यामुळे यात गोपनीयता राहतच नसून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही बदल होत नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने पहिली ते आठवीपर्यंत शालेयस्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत वर्षभर जे शिकविले जाते त्याचे किती आकलन झाले आहे, यासाठी मूल्यमापन चाचणी घेण्यास सुरुवात केली. या अंतर्गत पुण्याच्या महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून गणित आणि भाषा या विषयांच्या वर्षभरात तीन वेळा संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात येतात. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत पायाभूत मूल्यमापन चाचणी, ऑक्टोबरमध्ये घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि एप्रिल महिन्यात घेतली जाणारी चाचणी २ अशा एकूण तीन परीक्षा घेतल्या जातात. पहिली-दुसरीची परीक्षा २० गुणांची, तिसरी-चौथीची परीक्षा ३० गुणांची, पाचवीसाठी ४० आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ५० गुणांची परीक्षा घेतली जाते.

मुलांना शाळेत शिकविल्या जाणाऱ्या विषयाचे आकलन झाले आहे किंवा नाही, याची चाचपणी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा हे सरकारचे धोरण चांगले असले तरी या परीक्षांसाठी सरकारस्तरावरील पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही. पेपरचे गठ्ठे हे वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे सीलबंद न करताच शाळांमध्ये पाठविले जातात. त्यातच शाळेतील विद्यार्थीसंख्येपेक्षा या प्रश्नपत्रिका निम्म्यापेक्षादेखील कमी असतात. परीक्षेच्या आधी या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून घ्याव्या लागत असून शिक्षकांनी कितीही प्रयत्न केले तरी झेरॉक्ससाठी बाहेर गेलेल्या प्रश्नपत्रिकांमधून पेपरफुटी होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे या परीक्षांच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिल्यास परीक्षा घेण्याचा हेतू साध्य होऊ शकेल, मात्र वारंवार वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही या परीक्षेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे अनेक शाळांच्या शिक्षकांनी सांगितले.

शहरी भागात अडचण
याबाबत शिवाई बालक शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिंदे यांनी मूल्यमापन चाचणीच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका अपुऱ्या येत असल्यामुळे झेरॉक्स काढण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तर, गटशिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कल्याण ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक प्रश्नपत्रिका मिळाल्याची आपण खात्री केली असून शहरातील शाळांमध्ये ही समस्या असल्याचे सांगितले. मात्र शहरातील शाळांच्या प्रश्नाबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा दूरध्वनी बंद होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज