म. टा. प्रतिनिधी, ठाणे
विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोरदार वाऱ्यामुळे ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी झाडे कोसळण्याचा प्रकार घडला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, स्टेडिअमचा भाग आणि भास्कर कॉलनी परिसरामध्ये झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. सायंकाळी कल्याण-डोंबिवली परिसरात पडलेल्या पावासमुळे या भागातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता. तसेच पडझडीमुळे वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
गेली काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दसऱ्याचा मुहूर्त साधत पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. दसऱ्याचा मुहूर्त साधून खरेदीला निघालेल्या नागरिकांना फटका सहन करावा लागला. सायंकाळी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ग्रामण भागात पावसाची जोरदार हजेरी लावली होती. तर रात्री आठनंतर ठाणे शहरात पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडांची पडझड झाल्याचे समोर आले आहे. भास्कर कॉलनी परिसरात नारळाची झाडे कोसळल्याचे समोर आले. तर स्टेडिअम परिसरामध्येही एका रिक्षावर झाड कोसळल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्साहावर पाणी…
दसरा असल्याने सायंकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते. सोने आणि इलेट्रॉनिक वस्तूखरेदीसाठी मोठी गर्दी ठाण्यात असते. परंतु पावसाने त्यांच्या उत्साहावर यामुळे पाणी फिरले.