१८ हजार ४०१ उद्दिष्ट, ११४७ जोखीम क्षेत्र
म. टा. वृत्तसेवा,ठाणे
ठाणे जिल्ह्यामध्ये मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. काही बालके व गर्भवती माता काही कारणारस्तव लसीकरणापासून वंचित राहतात व लसीकरणापासून टाळत्या येणाऱ्या आजारांना बळी पडतात. ही समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातही मिशन इंद्रधनुष्य -२ ही मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत १८ हजार ४०१ जिल्ह्यातील गर्भवती माता आणि दोन वर्षांपर्यंतची बालके यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ११४७ गावे जोखीम क्षेत्र म्हणून नोंदविण्यात आली आहेत.
मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा, नगरपालिका, महानगरपालिका या स्तरांवर राबविण्यात येणार आहे. डिसेंबर २०१९पासून मार्च २०२०पर्यंत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून पुढील सात दिवस लसीकरणाचे प्रमाण कमी आढळलेल्या भागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना गरजेनुसार बीसीजी, धनुर्वात, डांग्या खोकला, मेंदूज्वर, घटसर्प, कावीळ, गोवर, रुबेला, रोटाव्हायरस प्रतिबंधक लसी तसेच अ जीवनसत्त्वाची मात्रा दिली जाणार आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण घेण्यात आल्याची माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली. ही मोहीम ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य समिती सभापती वैशाली चंदे, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
असे आहे नियोजन
डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून पुढील सात दिवस ही मोहीम सुरू राहील. यामध्ये २ ते ९ डिसेंबर, ६ ते १३ जानेवारी २०२०, ३ ते १० फेब्रुवारी २०२०, २ ते ९ मार्च २०२० असे नियोजन आहे.
समाजातील प्रत्येक बालकाला लसीकरण मिळेल, अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात लसीकरण केल्यामुळे लसीकरण न केल्याने होणाऱ्या आजारांना आळा बसेल. शिवाय बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- हिरालाल सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे