म. टा. वृत्तसेवा, वसई
श्रीनिवास मंगल महोत्सव अर्थात तिरुपती बालाजी यांचा गोरज मुहूर्तावर शाही विवाह सोहळा नालासोपारा येथे नुकताच पार पडला. तिरुपती देवस्थानाच्या वतीने प्रतिवर्षी ब्रह्मोत्सव साजरा करण्यात येतो त्या उत्सवाचे प्रतिरूप नालासोपारा येथे भाविकांना पाहता आले.
तिरूपती तिरूमाला देवस्थान आणि ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, विरार व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी तिरुमाला देवस्थानामार्फत श्रीनिवास, श्रीदेवी व भूदेवींच्या मूर्ती येथे आणल्या होत्या. शनिवारी पहाटेपासून सुरू झालेला हा मंगल सोहळा रात्री उशिरापर्यंत चालला. देवतांची भव्य रथोत्सवस्वरूप मिरवणूक व पालखी सोहळा गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा अशा जयघोषाने दुमदुमला होता. चेन्नई येथून आणलेल्या ७५ फूट उंचीच्या श्री बालाजी व पद्मावतीच्या प्रतिमांवर रोषणाई करण्यात आली. या सोहळ्याला तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली.