प्रवाशांच्या मागणीला खासदारांचा दुजोरा; रेल्वेमंत्र्यांकडे पत्र
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
ठाणे-पनवेल, ठाणे-वाशीदरम्यान सुरू करण्यात आलेली नवी एसी लोकल महागड्या प्रवासभाड्यामुळे अक्षरश: रिकामी धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना अन्य लोकलचा पर्याय निवडावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन खासदार राजन विचारे यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत त्यांना एसी लोकलचे दर कमी करून तीन डबे सर्वसामान्य गाड्यांना जोडण्याची मागणी केली आहे.
ठाणे ते पनवेल मार्गावर नव्याने सुरू झालेल्या वातानुकूलित लोकलचे दर अधिक असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाचे नुकसान व प्रवाशांचे हाल होत असल्याने खासदार राजन विचारे यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन वातानुकूलित लोकलचे दर कमी करून एसीचे ३ डबे सर्वसामान्य लोकलला जोडण्याची मागणी केली. ट्रान्स हार्बर मार्गावरील नवी मुंबईकडे प्रवास करणारे बहुतांश रेल्वे प्रवासी हे नोकरीनिमित्त या ठिकाणी प्रवास करीत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक असल्याने एसीचे महागडे भाडे त्यांना परवडत नाही. तसेच या मार्गावर ठाणे, वाशी, पनवेल येऊन जाऊन २४६ फेऱ्या व वातानुकूलित लोकलच्या १६ फेऱ्या असल्याने या फेऱ्या वाया जाऊ नये यासाठी वातानुकूलित लोकलचे तीन डबे सर्वसामान्य डब्यांना जोडून रेल्वेच्या फेऱ्यात वाढ करा, अशी मागणी खासदार विचारे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली. तसेच ठाणे, वाशी, नेरूळ, पनवेल, मार्गावर सुरू असलेल्या जुन्या गाड्यांऐवजी नव्या डब्यांच्या लोकल सोडण्याची गरज व्यक्त केली आहे.