पडझडीमुळे पाहुण्यांचा जीव धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
सरकारी पाहुण्यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्याच्या सरकारी विश्रामगृहाची पडझड सुरू झाली असून त्यामुळे विश्रामगृहात येणाऱ्या पाहुण्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विश्रामगृहाच्या लॉबीमधील छतावर पीओपीचे करण्यात आलेले सुशोभिकरण यंदाच्या पावसात कोसळले. त्यामुळे या विश्रामगृहाच्या लॉबीची रया गेली आहे. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कारंजेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विश्रामगृहाची दुर्दशा होऊ लागली असून ही परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.
ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सरकारी बैठकांचे साक्षीदार असलेल्या सरकारी विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या इमारतीमधील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळला. त्यानंतर छताचा भागातून पाणी पाझरू लागले. या भागात विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांसाठी हे विश्रामगृह धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून याची तत्काळ दखल घेऊन या छताच्या दुरुस्तीची सुरुवात करण्यात करण्याची मागणी केली जात आहे. या भागातील कारंजांचीही अवस्था अत्यंत दयनीय असून त्यांची दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.