म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे
थॅलेसेमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेलग्रस्त असल्याने अपंगत्व आलेल्या व्यक्तींना सरकारी योजना व आरक्षणाचा लाभ आता मिळू शकणार आहे. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती हक्क कायद्यान्वये अपंगत्वाचे विविध प्रकार निश्चित केले असून त्यांना अनेक हक्क बहाल करण्यात आले आहेत. त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देखील ठेवण्यात आले आहे. या कायद्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाने येणाऱ्या अपंगत्वाचा समावेश असूनही अशा व्यक्तींना अनेक सरकारी योजना आणि आरक्षणाचा लाभ आतापर्यंत मिळत नव्हता.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अलीकडेच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही बाब उपस्थित केली होती. त्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधून अशा अपंग व्यक्तींना आरक्षण व अन्य योजनांचा लाभ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या अपंगत्वासह एकूण २१ प्रकारच्या अपंगत्वाने बाधित व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
हा शासन निर्णय १४ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आला असून या निर्णयामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया आणि सिकलसेलग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.