म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर
उत्तन हा भाईंदरमधील समुद्र किनारपट्टीचा परिसर असल्याने मागील दोन दिवसांपासून मिरा-भाईंदर महापालिका तसेच अन्य सरकारी यंत्रणा निसर्ग चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होत्या. मात्र वादळाचा फटका किनाऱ्याला बसला नाही अन् रिमझिम पावसावरच निभावले. बुधवार सकाळपासूनच पोलिस प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफ व आरोग्य विभागाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. समुद्रालगत राहणाऱ्या मच्छिमारांना सेंट जोसेफ शाळेत स्थलांतरित केले होते. वादळाचा धोका वाढल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी बसची व्यवस्थाही करण्यात आली होती. उत्तनच्या डोंगरावर रस्त्यात एक झाड कोसळल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत हे झाड बाजूला केले.