म. टा. वृत्तसेवा, ठाणे
आरटीई प्रवेश अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया १३ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचारनंतर सुरू झाली. ऑनलाइन अर्ज भरताना पालक व पाल्यांची नावे पूर्ण भरलीच जात नसल्यामुळे प्रवेश अर्जाची प्रक्रिया आता तांत्रिक अडचणीत सापडली आहे. यंदा ६६९ शाळांमध्ये पहिलीसाठी २ हजार ३४१ प्रवेश आरक्षित करण्यात आले आहेत.
समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण विनामूल्य मिळावे यासाठी सरकारच्या वतीने या घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीच्या मंजूर जागांच्या २५ टक्के प्रवेशासाठी त्या त्या शाळांच्या स्तरावर राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार ठाण्यातील ६६९ शाळांमधील २५टक्के मोफत ऑनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ तर पूर्व प्राथमिकसाठी २ हजार ३४१ मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यात ही प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जात आहे. पाल्याचा अर्ज rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून भरताना नावे पूर्ण भरली जात नव्हती.