म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दोन माजी नगरसेवकांसह पाच जणांनी जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. १४ नोव्हेंबर रोजी ठाणे पोलिसांनी याबाबतचे आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडावे, असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले आहेत. पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जामिनाबाबतचा निर्णय होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींसाठी ३० दिवसांची न्यायालयीन कोठडी पोलिसांनी मंजूर करून घेतली आहे.
माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असून पहिल्या टप्प्यात माजी नगरसेवक सुधीर बर्गे, राजकुमार यादव यांच्यासह प्रदीप पाटील, शौकत मुलानी आणि मुस्तफा इराकी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणांचा तपास सुरू असून काही बांधकाम व्यावसायिकांनी या पाच जणांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस कोठडीत असताना या आरोपींची चौकशी झाल्यानंतर त्याबाबतचे पुरावे संकलन करण्याचे काम खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे. या पाचपैकी काही आरोपी न्यायालयीन कोठडीत तर काही पोलिस कोठडीत होते. सोमवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या आरोपींच्यावतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
या आरोपींच्या विरोधातील पुराव्यांचे संकलन करायचे असून जामीन मंजूर केल्यास आरोपींकडून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने केला जात आहे. न्यायालयाने तूर्त ३० दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. मात्र, आरोपींच्यावतीने केल्या जाणाऱ्या जामीन अर्जावर १४ तारखेला सुनावणी घेतली जाणार असून पोलिसांनी त्यावरील आपले म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.