म. टा. वृतसेवा, पालघर
पालघर जिल्ह्यातील दुर्गम अशा जव्हार तालुक्यात रोजगाराची कोणतीही कामे सुरू नसल्यामुळे या भागातील आदिवासींनी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली असून तालुक्यातील खेडी, पाडे व वाड्या ओस पडल्या आहेत .
यावर्षी पाऊस लांबला होता. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे आदिवासींचे रोजगार अडकले होते. आता मात्र पाऊस थांबला आहे. शेतीची कामे आटोपली आहेत. आता जव्हार तालुक्यात कोणताही रोजगार सुरू नाही. त्यामुळे या भागातील आदिवासींनी रोजगारासाठी शहराकडे धाव घेतली आहे.
पाऊस लांबल्याने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून या भागातील आदिवासी स्वतःच्या कुटुंबापुरती शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. परंतु यंदा पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे रोजगारही दुरावला आहे.
तालुक्यात रोजगार हमीची कोणतीही कामे सुरू नाहीत. रोजगार सुरू करण्यासाठी सामाजिक संघटना आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आली आहे. परंतु याची अद्याप कोणत्याही शासकीय विभागाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे मिळेल त्या कामांसाठी आदिवासी शहरांकडे मोठ्या प्रमाणात आपले बिऱ्हाड घेऊन जाऊ लागला आहे. यामध्ये जव्हार तालुक्यातील सारसून, गरदवाडी, जुनीजव्हार या गावांतील आदिवासी पिकअप वाहनांमध्ये आपले बिऱ्हाड घेऊन पालघर येथे गवत कापणीसाठी तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बिगारी म्हणून आले आहेत.
यामध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश असून ते लहान मुलांनाही सोबत घेऊन आले आहेत. रोजगारासाठी स्थलांतर केल्याने मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत असून कुपोषणासारख्या समस्या समोर येत आहेत.
वनविभाग, कृषिविभाग, तहसीलदार, पंचायत समिती आदी विभागांकडून तालुक्यातील आदिवासींना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच येत असून त्यामुळे रोजगार हमीची कामे खोळंबण्याची शक्यता असल्याने ही कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी येथील आदिवासी करत आहेत. जव्हार तालुक्यातील रोजगारासाठी निघालेली मंडळी ठाणे, नाशिक, नवी मुंबई, मिरारोड, भाईंदर, वसई, पालघर, वाडा या शहरांकडे वळताना दिसत आहेत.
जव्हार तालुक्यातील गदरवाडी येथे रोजगार उपलब्ध नसल्याने आम्ही पालघर येथे कामासाठी निघालो आहोत. गवत कापणीच्या कामावर आम्हाला ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळणार असल्याने आमचे संपूर्ण कुटुंब तिकडे चाललो आहे.
राजू इंधन,
मजूर, गदरवाडी
जव्हार तालुक्यात काही ठिकाणी 'रोहयो'ची कामे सुरू आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत कामासाठीच प्रस्ताव मागितले आहेत. प्रस्ताव आल्यावर त्या गावांमध्ये लागलीच कामे सुरू करण्यात येतील.
उद्धव मोरे,
सहायक कार्यक्रम अधिकारी
पंचायत समिती, जव्हार
जव्हार तालुक्यातील कासाटवाडी ग्राम पंचायतीमध्ये एकूण आठ महसुली गावे, ११ पाडे व वाड्या आहेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन रोजगारहमीच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार तेथे कामे सुरू केली जाणार आहेत.
मिलिंद गायकवाड,
ग्रामविकास अधिकारी कासटवाडी,