म. टा. वृत्तसेवा, पालघर
मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार स्पर्धेत जव्हार महाविद्यालयाला उत्तुंग यश प्राप्त झाले असून, विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पाची विद्यापीठस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अविष्कार संशोधन स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, तसेच जोपासना व्हावी व तिला चालना मिळावी, या उद्देशाने सदर स्पर्धा मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी घेतली जाते.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार येथील रसायनशास्त्र विभागातील इमरोज थारा व अंकिता घरवे या तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेत 'केमिकल री-सायकलिंग ऑफ प्लास्टिक वेस्ट बाय इको-फ्रेंडली कॅटालिस्ट्स' या विषयावर आपला संशोधन प्रकल्प सादर केला. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी जव्हार महाविद्यालयातील विद्यार्थिनिंनी सादर केलेल्या प्रकल्पाची विद्यापीठस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या तज्ज्ञ परीक्षकांच्या समितीने या संशोधन प्रकल्पाचे परीक्षण व मूल्यमापन केले. जव्हार महाविद्यालयाच्या इमरोज थारा व अंकिता घरवे यांना रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम व उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.