अ‍ॅपशहर

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील धक्कादायक वास्तव उघड; रस्त्याअभावी महिला सरपंचासह जावयाचा मृत्यू

Thane News Updates : सर्पदंशानंतर रस्ता नसल्याने मुरबाडमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर झाल्यामुळे महिला सरपंच बारकाबाई हिलम यांचा मृत्यू झाला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2022, 4:30 pm
कल्पेश गोरडे| ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. मात्र याच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्त्यांच्या अभावामुळे मागील महिनाभरात एका महिला सरपंचाला आणि तिच्या जावयाला आपला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अपुऱ्या सोयी-सुविधा आणि रस्त्यांचा अभावामुळे मुरबाड तालुक्यातील ओजिवाले कातकरीवाडीत सर्पदंश झाल्यानंतर ताबोडतोब उपचार न मिळाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde thane adiwasi pada
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुरबाड शहरापासून २७ किमी अंतरावरील धसईबाजार पेठेच्या जवळ ओजिवले गावाच्या हद्दीत दीड कि.मी. अंतरावर कातकरवाडी आहे. या वाडीत ६० आदिवासी बांधव राहतात. या पाड्यातील अदिवासींना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दीड कि.मी. पायपीट करावी लागते. ५५ वर्षीय बारकाबाई किसन हिलम या गावच्या सरपंच असलेल्या महिलेला ८ ऑगस्ट रोजी घरातच विषारी सापाने दंश केला होता. मात्र नातेवाईकांनी त्यांना रस्त्याअभावी झोळीतून, चिखलयुक्त रस्त्यातून पायपीट करत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. रस्ता नसल्याने मुरबाडमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास उशीर झाल्याने बारकाबाई हिलम यांचा मृत्यू झाला.

नितेश राणेंकडून देवेंद्र फडणवीसांचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख, श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना उघड धमकी

धक्कादायक बाब म्हणजे मृत सरपंच बारकाबाई यांचे ३५ वर्षीय जावई सुभाष टिकाराम वाघ हे घरात झोपलेले असताना त्यांनाही ५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या ४ वाजताच्या सुमारास या पाड्यातील विषारी सापाने दंश केला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सुभाष वाघ यांना टोकावडे येथील शासकीय रुग्णालयात झोळीतून नेले. मात्र त्यांच्यावरही उपचार करण्यास उशीर झाल्याने अंगात विष भिनल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ अपुऱ्या सोयी-सुविधा आणि रस्त्यांचा अभावामुळे सासू आणि जावयाचा बळी गेल्याची खंत कुटुंबप्रमु़ख किसन राजाराम हिलम यांनी व्यक्त केली आहे. जर या वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता असता तर सरपंच असलेल्या माझ्या पत्नीचा व जावयाचा प्राण वाचला असता असंही त्यांनी सांगितलं. तसंच रस्त्याअभावी आणखी बळी जाण्याची वाट न पाहता शासनाने आता तरी आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आदिवासी पाड्यातील कुटुंबांनी केली आहे.

रस्ता तर नाहीच, शिवाय ५० ते ६० गावात स्मशानभूमीही नाही

उन्हाळ्यात बहुतांश आदिवासी पाड्यांना रस्त्याची अडचण भासत नसली तरी, मात्र पावसाळ्यात ओढ्यातून तर कधी चि़खलयुक्त पायवाटेतून मार्ग काढीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. तसंच रुग्णांना झोळीचा आधार घेत रुग्णालयात न्यावे लागते. मुरबाड तालुक्यातील ६० ते ६५ आदिवासी पाड्यांना आजही रस्ता तर नाहीच, शिवाय तालुक्यातील ५० ते ६० गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाचे लेख