म. टा. वृत्तसेवा, पालघर
चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ कॉलेजचा ३३वा वर्धापन दिन समारंभ १७ जुलै रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. दिव्या राणे आणि समूहाने शब्दसुमनांनी, तर रिद्धी सोळंकी या विद्यार्थिनीने नृत्याविष्कार करून सर्वांचे स्वागत केले.
कॉलेजचे उपप्राचार्य मेजर डॉ. दीपक शेलार यांनी प्रास्ताविक करताना कॉलेजातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची मागील वर्षातील कामगिरी, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, कला अकादमी, वाणिज्य अकादमी, ग्रंथालय इ. विभागांच्या कार्याचा आढावा घेतला. उपप्रचार्या डॉ. सुचिता करवीर आणि प्रा. रंजिता कपूर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. याप्रसंगी कॉलेजच्या कार्यवृत्तांताचे प्रकाशन डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वसईच्या जी. जी. कॉलेजच्या माजी प्राचार्य, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी मूल्य, शिक्षण आणि संस्कार यांची आजच्या काळातील गरज सांगतानाच आरोग्य, यश यांची जपणूक करून अपयश पचविण्याची क्षमता, मानवी संवेदना यांचेही महत्त्व अधोरेखित केले. हे कॉलेज ग्रामीण भागातील असूनही कॉलेजने केलेल्या आजवरच्या प्रगतीबद्दल त्यांनी कौतुक केले.
विशेष अतिथी म्हणून बोलताना चिंचणी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटी याद्वारे अशक्यप्राय यशही सहजशक्य होते, असे मत मांडले. यावेळी सर्व शाखांमधील बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रजनीकांत श्रॉफ यांनी अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजची सुरुवातीपासूनची वाटचाल आणि प्रगती यांचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी सीटीईएसचे सेक्रेटरी महेंद्र चुरी, सदस्य डॉ. रमिलाबेन श्रॉफ, महेश पाटील, संस्थेचे ट्रस्टी नंदकुमार कापडिया, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य अनिल भट्टलवार, दीपक भावे, तसेच कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, कार्यवृत्तांताचे संपादक ग्रंथपाल अण्णा डोंगरदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेरणा राऊत आणि प्रा. विद्या दहिसरकर यांनी केले, तर आभार डॉ. वनश्री फाळके यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.